Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 August, 2008

मंत्री असल्याची शरम वाटते : मिकी

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): जनतेशी देणेघेणे नसल्याच्या अविर्भावात वावरत असलेल्या सरकारात आपण एक मंत्री आहोत याची आपल्याला शरम वाटते. हे सरकार असेच बेजबाबदारपणे वागत राहिले तर वेगळा मार्ग चोखाळावा लागेल,असा गर्भित इशारा पर्यटनमंत्री मिकी पाशेको (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांनी आज दिला.
येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात एकीकडे विविध विषयांवरून जनता रस्त्यावर उतरत असताना मंत्रिमंडळ तथा सरकारात कोणताच समन्वय उरलेला नाही. त्यामुळे या सरकारात राहण्याबाबत नक्कीच फेरविचार करावा लागेल,असेही मिकी यांनी स्पष्ट केले.
मेगा प्रकल्पांविरोधात राज्यात पेटलेल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता गावागावांत उमटू लागले आहेत. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील वातावरणच बिघडत चालले असून भाऊ-भाऊ, सख्खे शेजारी तसेच गावातील लोक एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे सोडून मुकाट्याने हा प्रकार चालूच ठेवण्याची कृती निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. गोमंतकीयांना आपसात झुंजवण्याचा हा प्रकार तात्काळ बंद करा असा इशाराही मिकींनी दिला.
मेगा प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला नगरनियोजनमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी जबाब देण्याची गरज आहे. स्थानिक लोक आता लोकप्रतिनिधी व सरपंचांना दोष देत आहेत. एखाद्या प्रकल्पाला पंचायतीकडून स्थगिती दिल्यानंतर थेट पंचायत संचालनालयातून ही स्थगिती उठवली जाते व सचिव पातळीवर बांधकाम करण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले जातात हे कसे,असा सवालही मिकींनी उपस्थित केला.
एखाद्या प्रकल्पाचा आराखडा सादर केल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात बिल्डरकडून काम सुरू केले जाते त्यावेळी आराखड्याचे पूर्णपणे उल्लंघन केले जाते व नंतर ही फाईल पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवली जाते. हा प्रकारच बेकायदा आहे. पुन्हा मंजुरीचे प्रस्ताव ताबडतोब फेटाळण्यात यावेत व अशी बेकायदा बांधकामे ताबडतोब पाडण्यात यावीत,अशी मागणी त्यांनी केली. पक्षाने अद्याप "व्हीप'जारी केला नसल्याचे सांगून तीनही आमदार एकसंध असताना "व्हीप'ची गरज नाही,असे ते म्हणाले.
...तर मगो राष्ट्रवादीमध्ये
का विलीन झाला नाही?

राष्ट्रवादी पक्षाचे तीनही आमदार एकत्र आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहा जणांचा वेगळा गट स्थापन केल्याची घोषणा केली असली तरी त्याबाबत अन्य सदस्य गंभीर नसल्याची प्रतिक्रिया मिकी यांनी व्यक्त केली. हा गट खरोखरच ताकदवान बनवायचा होता तर मगो पक्षाचे राष्ट्रवादीत विलीनीकरण का झाले नाही,असा सवालही त्यांनी केला. पक्ष या नात्याने जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा आमदार या नात्याने आपण तिघेही एकत्र असू,असेही ते म्हणाले.

No comments: