Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 13 August, 2008

वाद अमरनाथच्या जमिनीचा भाजपच्या 'जेलभरो'ला गोव्यात प्रचंड प्रतिसाद

'बम बम भोलेनाथ'च्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांना अटक
पणजी, दि.१३ (प्रतिनिधी): जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ देवस्थान समितीला दिलेली जागा काही कट्टरवादी संघटनांच्या दबावाला बळी पडून पुन्हा ताब्यात घेण्याच्या कृतीचा निषेध म्हणून आज गोवा प्रदेश भाजपतर्फे जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. ही जागा ताबडतोब अमरनाथ देवस्थानला देण्याची मागणी करून "काबो' राजभवनावर शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आज भव्य मोर्चा काढून स्वतःला अटक करवून घेतली. यावेळी दोनापावला परिसर "बम बम भोलेनाथ' "जय श्री राम',"सोनिया जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है' अशा घोषणांनी दुमदुमला.
आज संध्याकाळी ४ वाजता दोनापावला येथे चौकावर शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भर पावसात या आंदोलनात सहभागी होऊन जम्मू-काश्मीर सरकारच्या कृतीचा निषेध केला. भाजपचे सर्व आमदार, प्रदेश कार्यकारिणी, युवा मोर्चा तसेच महिला मोर्चा व इतर कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती याप्रसंगी लाभली होती. अमरनाथ सेवा संघाने या आंदोलनाचे स्वागत करून भाजपला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त करतानाच या आंदोलनात पूर्ण सहभाग दर्शवला.
यावेळी मोर्चेकऱ्यांसमोर भाषण करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी जम्मू-काश्मीर सरकाराबरोबर केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवरही हल्लाबोल चढवला. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या लोकांच्या दबावापुढे नमून देशातील सुमारे ८० कोटी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे धाडस या सरकारला झालेच कसे,असा खडा सवाल त्यांनी केला.
सर्वधर्मसमभावाच्या वल्गना करणाऱ्या सरकारकडून हिंदूंच्याबाबतीत दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. हज यात्रेकरूंसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत व अनुदानाला हिंदूंनी कधी विरोध केला नाही व आता कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेकरूंसाठी निवाऱ्याची व इतर सोयीसुविधांसाठी दिलेली जागा परत घेण्यापर्यंत या सरकारची मजल जाते, यावरून हे सरकार हिंदूंना गृहीत धरीत असल्याची टीका नाईक यांनी केली. ही जागा ताबडतोब परत करावी अन्यथा हिंदू पेटून उठतील,असा इशारात्यांनी दिला.
जम्मू-काश्मीरात सध्या अमरनाथ प्रकरणी हिंदूंनी चालवलेल्या आंदोलनाचे पडसाद आता गोव्यातही उमटू लागले आहेत.विघटनवादाची बिजे पेरणाऱ्या लोकांना "राजाश्रय' मिळत असल्याचा आरोपही नाईक यांनी केला.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी जम्मू-काश्मीर सरकारवर टीकेची झोड उडवली. केवळ काही देशविघातक संघटनांच्या दबावामुळे अधिसूचित केलेली जमीन रद्द करण्याचे कृत्य म्हणजे भेकडपणाचा कळस आहे. सेतूसमुद्रम प्रकल्पाबाबतही केंद्र सरकारची भूमिका अत्यंत घृणास्पद आहे. प्रभू रामचंद्राचे अस्तित्वच या सरकारने नाकारून मूर्खपणाचा कळस केला आहे. याप्रकरणी केंद्रीयमंत्री टी. आर. बालू यांच्या भूमिकेवरही पर्रीकरांनी कोरडे ओढले. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर,सरचिटणीस गोविंद पर्वतकर आदींनी विचार व्यक्त केले. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्तर गोवा अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनीही उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संयमाने स्थिती हाताळली. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस कोर्त,उपनिरीक्षक राहुल परब हेही यावेळी हजर होते.

No comments: