Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 13 August, 2008

विहिंपचा देशव्यापी 'चक्का जाम' यशस्वी

लखनौमध्ये रेल्वे रोखली
देशभरातील वाहतूक प्रभावित
चेन्नईमध्ये ६०० कार्यकर्त्यांना अटक

नवी दिल्ली, दि. १३ : जगभरातील कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अमरनाथ देवस्थानाला दिलेली वनजमीन परत घेतल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने आज पुकारलेला देशव्यापी "चक्का जाम' यशस्वी ठरला. या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीसह सर्वच प्रमुख शहरांमधील वाहतूक चांगलीच प्रभावित झाली. अनेक ठिकाणी या आंदोलनाचा फटका रेल्वेलाही बसला. लखनौमध्ये विहिंपच्या कार्यकर्त्यांनी बाघ एक्सप्रेस रोखली, तर आग्रा येथे दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस रोखण्यात आली. फिरोझाबाद, मेरठमध्येही अनेक ठिकाणी रेल्वे रोखण्यात आल्या. चेन्नईमध्ये आंदोलनकर्त्या विहिंप व भाजपाच्या एकूण सहाशे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तर नाशिकमध्ये भाजपा, विहिंपच्या एकूण दीडशे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
सकाळी ९ वाजतापासून "चक्का जाम' आंदोलनाला सुरुवात झाली. दोन तास हा "चक्का जाम' सुरू होता. विहिंपसह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील वाहतूक ठप्प केली. सार्वजनिक बस, खाजगी वाहने, रिक्षा, ऑटो, दुचाकी कोणालाही आंदोलकांनी जाऊ दिले नाही. केवळ आपात सेवा आणि शाळेच्या बसेस यातून वगळण्यात आल्या होत्या.
""केंद्र सरकारला अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन द्यावीच लागेल. जो पर्यंत जमीन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन जारीच ठेवू,''असा रोखठोक इशारा विहिंपचे महासचिव प्रवीणभाई तोगडिया यांनी दिला आहे. अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन परत द्यावी, यासाठी संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन पेटलेले असून, संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. असे असूनही लोक संचारबंदी मोडून रस्त्यांवर उतरून आंदोलन करीतच आहेत, एवढे भीषण रूप या आंदोलनाने धारण केलेले आहे.
ओरिसा, पंजाब, बिहार, राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह सर्वच राज्यात व दिल्ली, मुंबई, लखनौ, आग्रा, अहमदाबाद, जयपूर, वाराणसी, जबलपूरसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये "चक्का जाम' आंदोलन यशस्वी ठरले. आंदोलकांनी जबलपूरमध्ये ११ ठिकाणी "चक्का जाम' केला. मेरठमध्ये चार प्रमुख चौकांमध्ये "चक्का जाम' झाला. वाराणसीच्या अंधरा पुलानजीक "चक्का जाम'मुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले. दिल्लीमध्ये विकास मार्ग, अक्षरधाम, दीपाली चौक, वझीरपूर, डीएनडी, शंकरपूर, मूलचंद आणि रोहणीसह अनेक भागांमध्ये वाहतूक रोखून धरली. दिल्ली-नोएडा-दिल्ली द्रुतगती मार्ग, दिल्ली कॅन्टोनमेंट, उत्तमनगर, धौला कुआ, दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्ग आदी भागातही "चक्का जाम'मुळे वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलकांनी आग्रामध्ये दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस पाऊण तासापर्यंत रोखली. लखनौमध्ये विहिंपच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी बादशहानगर रेल्वेस्थानकानजीक बाघ एक्सप्रेस रोखली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरच ही एक्सप्रेस सोडण्यात आली.
नाशिकमध्ये १५० कार्यकर्त्यांना अटक
अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन परत मिळण्यासाठी विहिंपने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला नाशिकमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान शहर पोलिसांनी विहिंप, भाजपा आणि हिंदू एकता आंदोलनाच्या तब्बल दीडशे कार्यकर्त्यांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अत्यंत वर्दळीच्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर कार्यकर्त्यांनी वाहतूक अडवून धरल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अर्ध्या तासपर्यंत वाहतूक अडविण्यात आली होती.
""अमरनाथ देवस्थान मंडळाच्या जमिनीचा प्रश्न लवकर न सुटल्यास आम्ही "चलो जम्मू' आंदोलन पुकारू,''असा इशारा विहिंपचे प्रदेश प्रमुख एकनाथ शेट्ये यांनी दिला.
गुजरातमध्येही "चक्का जाम'
राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये "चक्का जाम' करण्यात आला. अहमदाबादमधील नरोल, नरोडा, सीटीएम, पाल्दी आणि इन्कम टॅक्स सर्कल आदी भागात विहिंप व भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. बडोदा येथेही "चक्का जाम'आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. विहिंपच्या ५५ कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. यामध्ये १५ महिला कार्यकर्त्या देखील होत्या. ठिकठिकाणी भाजपा व विहिंपचे कार्यकर्ते ध्वज घेऊन रस्त्यावर उभे होते व "अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन परत मिळालीच पाहिजे,'अशी जोरदार नारेबाजी करीत होते.
पॉंडिचेरीमध्ये शंभर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तर छत्तीसगढमध्ये शांततापूर्वक आंदोलन पार पडले.
--------------------------------------------------------------
श्रीनगरमध्ये संचारबंदी सहा तासांसाठी शिथिल
श्रीनगर,दि. १३: संचारबंदी शिथिल करण्याच्या कालावधीत तीन तासांची वाढ करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाने आज घेतला. या वाढीमुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली. संचारबंदी शिथिल करण्याच्या पहिल्या सहा तासांच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना न घडल्याने जम्मू-काश्मीर प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
""पहिल्यांदा सहा तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. या सहा तासांमध्ये शांतता राहिल्याने तसेच कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त न आल्यानेच संचारबंदी शिथिल करण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
प्रथम सकाळी ८ ते ११ या दरम्यान संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, या उद्देशाने या कालावधीत आणखी तीन तासांची म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली.
फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या सहा दिवसांपासून खोऱ्यातील जनजीवन प्रभावित झालेले आहे. संचारबंदी शिथिल करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आल्याने भाजीपाला, धान्य, औषधसामग्री यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची लोक खरेदी करताना दिसून आले.
संचारबंदी शिथिल होताच शहरातील मोठ्या भागात लोक रस्त्यावर उतरले व त्यांनी शांततापूर्वक निदर्शने केली. काश्मीर खोऱ्यातील आर्थिक नाकेबंदीच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांत पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही लोक बळी पडले होते. या कारवाईचा निषेध म्हणून शांततापूर्वक निदर्शने करण्यात आली.
बेमिना, सफकदल, फतेहकदल आणि रैनावारी येथे दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करण्याचा इशारा दिला, असेही सूत्रांनी सांगितले.
सफकदल येथे संतप्त जमावाने साध्या वेशातील पोलिसाला मारहाण केली व त्यांच्या वाहनाला आग देखील लावली. यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यावर त्यांनी तुफान दगडफेक केली, असेही सूत्रांनी सांगितले.
निशात, जमालट्टा, माटमलू, रामबाग, नतीपोरा, बाग-ए-मेहताब, करणनगर व श्रीनगरमधील लवायपोरा येथूनही दगडफेकीच्या घटना घडल्याचे वृत्त हाती आलेले आहे. तेंगपोरा येथे बायपास रोडवर संतप्त लोकांच्या जमावाने तेलाच्या टॅंकरला आग लावून दिली, असेही सूत्रांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
किश्तवाडमध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
जम्मू, दि. १३ : अमरनाथ देवस्थानाला जमीन देण्याच्या मागणीसाठी जम्मूमध्ये पेटलेल्या आंदोलनाने रौद्र रूप धारण केलेले आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांना रोखण्यासाठी किश्तवाडमध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललेली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यानंतरही आंदोलक रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करीत असल्याने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------

No comments: