Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 August, 2008

दरी रूंदावत चालली : राष्ट्रवादीचे तिन्ही आमदार चहापानाला गैरहजर

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाने दिलेला सावधानतेचा इशारा व काल पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी मेगा प्रकल्पाच्या वादावरून थेट मुख्यमंत्र्यांवरच केलेला हल्लाबोल, या सर्व गोष्टी अगदी ताज्या असताना आज राष्ट्रवादी पक्षाचे तीनही आमदार राजभवनवर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची चिंता वाढली आहे.
स्वातंत्रदिनानिमित्त राजभवनवर दरवर्षी राज्यपालांतर्फे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला सत्ताधारी गटाचे सदस्य हटकून उपस्थित राहतात. तथापि, यावेळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस या विद्यमान आघाडी सरकारातील महत्त्वाचा घटक असलेल्या पक्षाचे तीनही आमदार गैरहजर राहिले व त्यामुळे राजकीय चर्चेने चांगलाच सूर पकडला. यासंदर्भात तीनही नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या चहापानाला हजर राहू शकलो नाही, असे कारण पुढे केले. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला काय,असे विचारताच त्यांनी याचा स्पष्ट इन्कार केला.
येत्या सोमवारी १८ पासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान कॉंग्रेस आघाडीत पुन्हा बिघाडीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अद्याप "व्हीप' जारी केला नसल्याने मुख्यमंत्र्यांसाठी ती नवी डोकेदुखी ठरली आहे. पक्षाचे तीनही नेते एकसंध असल्याने "व्हीप'ची गरज काय,अशी प्रतिक्रिया थिवीचे आमदार तथा संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. सरकार सत्तेवर येऊन गेले वर्षभर केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या तीनही आमदारांनी यावेळी आपल्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी चांगलाच हट्ट धरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकरणी त्यांनी आपल्या श्रेष्ठींनाही स्पष्ट संकेत दिल्याचे सांगण्यात येते. अलीकडेच विधिमंडळ गटाच्या बैठकीत त्यांनी आघाडीत मिळत असलेल्या वागणुकीबाबत निराशा व्यक्त केली व सरकारच्या कार्यपद्धतीवरही जाहीर टीका केली होती. दक्षिण गोव्यात प्रामुख्याने बाणावली मतदारसंघात मेगा प्रकल्पांवरून निर्माण झालेल्या वादाची झळ आता स्थानिक प्रतिनिधी या नात्याने पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना बसायला सुरुवात झाल्याने त्यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्री व पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांना जाहीर आव्हान दिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या नाराजीचा फायदा दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाला सुरुंग लावण्यासाठी सरकारातीलच काही नेते करीत असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विद्यमान सरकारात मंत्रिपद मिळाले नाहीच; परंतु मतदारसंघाच्या विकासकामांबाबतही योग्य न्याय मिळत नसल्याने सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. या नेत्यांकरवी नेतृत्व बदलाची मागणी पुढे रेटण्यासाठी कॉंग्रेस पक्षातीलच काही नेते प्रयत्नरत असून अधिवेशनापूर्वी राज्यात कोणतेही राजकीय नाट्य घडण्याची दाट शक्यता आहे.

No comments: