Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 August, 2008

दक्षिण गोव्यात 156 जणांचे स्थलांतर

मडगाव, दि. 10 (प्रतिनिधी) - काल सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज दिवसभरही कायम राहिला व त्याच्या जोडीने आज वादळी वाऱ्याने मांडलेल्या थैमानाने संपूर्ण दक्षिण गोव्याचे जनजीवन विस्कळीत झाले.मात्र कुठेच जरी जीवितहानी झालेली नसली तरी वित्तीय हानीचे प्रमाण मोठे असून तिचा अंदाज घेतला जात आहे. तळ्याबांध -बाणावली येथे 25 झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांतील 90 रहिवाशांना अन्यत्र हलविले तसेच खारेबांद येथील 20 झोपड्यातील 66 मिळून एकूण 156 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन सतर्क असून कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यासाठी सारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज सायंकाळी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी सासष्टीतील बहुतेक भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळपासून आत्तापर्यंत वादळी वाऱ्यांमुळे एकूण 83 झाडे पडली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले . झाडे कोसळण्याचे जास्त प्रमाण कुंकळ्ळीत होते. मडगावात दोन जुन्या घराच्या भिंती कोसळल्या पण त्यात कोणी जखमी झालेले नाही. पैकी एका घराची धोकादायक असलेली व दुसऱ्या घरावर पडण्याची शक्यता असलेली भिंत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले ते सायंकाळी उशिरापर्यंत चालू होते. मडगावात दामोदर शिरोडकर, अमृतनगर येथे एम. एच. चाको यांच्या घरात पाणी शिरले.
5 वीज खांबावर झाडे पडली तर कोंब -कुंकळ्ली,शिरवडे- नावेली,मोंगल असोळणा येथे घरावर माड पडून मोठी नुकसानी झाली.
संततधार पावसामुळे मडगाव- केपे रस्ता पारोडा येथे पाण्याखाली गेला होता व त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक केपेमार्गे वळविण्यात आली होती.पारोडा भागातील वीजपुरवठाही काल रात्रीपासून आज दिवसभर खंडित होता. पारोडा छातीपर्यंत पोचेल इतके पाणी रस्त्यावर जमा झाले होते असे तेथून पाण्यातून चालत आलेल्या एकाने सांगितले. सदर रस्ता सखल असल्याने दरवर्षी हा प्रकार घडतो यास्तव पूरनियंत्रण कार्यक्रमाखाली या संपूर्ण रस्त्याला उंची देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून यंदा हे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कुंकळ्ळी येथे वादळी वाऱ्याचा जास्त तडाका बसला व काही ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने काही भाग अंधारात राहिला.
जुना बाजार , खारेबांध , तळ्याबांध , आके येथे संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले तळ्याबांध व जुनाबाजार येथे तर सागराचे रूप आले होते पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. खारेबांध वगैरे भागात प्रशासनाने अगोदरच झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची दक्षता घेतल्याने यंदा झोपड्या बुडण्याचे प्रकार घडले नाहीत तर तळ्याबांध मधील 90 आपद्ग्रस्तांना फातोर्डा स्टेडियमवर हलविले गेले. मडगावातील काही भागात तुंबलेल्या पाण्याला वाट करून देण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागल्याची माहितीही त्यांनी दिली.
दक्षिण गोव्यातील मामलेदारांना या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
साळावलीवर बारीक नजर
साळावली धरणातील पाण्याची पातळी वाढत असली तरी चिंता करण्याची काळजी नाही तेथे संबंधित अधिकारी डोळ्यात तेल घालून आहेत .जलसंसाधन खात्याच्या मुख्य अभियंत्याशी प्रशासन संपर्क ठेवून आहे व पाण्याची पातळी वाढून ते सोडावे लागले तर संबंधित भागातील लोकांना सावधगिरीसाठी कळविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे गोकुळदास नाईक यांनी सांगितले.

अनमोड रस्ता अजून बंद

अनमोड येथील रस्ता कोसळण्याच्या जागी युद्धपातळीवर काम चालू असून आज रात्रीही तेथील वाहतूक खबरदारीपोटी बंद ठेवली जाईल उद्या संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.तेथे 60 ट्रक व 4 व्हील लोडर काम करीत असून आज रात्रीचेही काम चालू राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली..

No comments: