Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 August, 2008

पणजीतील नव्या बाजार प्रकल्पाचा विचका

पणजी, दि. १५ (ज्योती धोंड): २९ मे २००३. गोवा घटक राज्याची पूर्वसंध्या.या पूर्वसंध्येला गोव्याच्या कानाकोपऱ्यातील तरुण, वयस्क, व इतरांनीही पणजी बाजाराकडे गर्दी केली होती. असे काय बरे होते त्या दिवशी या बाजारात? कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी बहुचर्चित नव्या पणजी बाजार प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते.या नवीन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर शेवटचा हात फिरविण्यात येत होता आणि सारे बाजार संकुल आकर्षक रोषणाईने झगमगत होते.
"पणजीकारांमध्ये' या हायटेक बाजारात नवी दुकाने थाटण्याचा उत्साह दिसत होता. तसेच छोट्या भाजीवाल्यांच्या कपाळावर आपल्याला मिळणारी छोटीशी अपुरी जागा, सुविधा व कर यासंबंधी चिंतेच्या आठ्या दिसत होत्या.मात्र त्यांचे स्थानिक आमदार व माजी मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेला आदर्श अशा सुखसोयी देण्याचा विडा उचलून गोवा एक कल्याणकारी राज्य बनविण्याचा दृष्टिकोन ठेवताना, सर्वांना योग्य त्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते.
३० मे २००३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले तेव्हा प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. पणजीतील या प्रकल्पाच्या पहिल्या टप्याचे बांधकाम १ नोव्हेंबर २००२ रोजी सुरू होऊन सात महिन्यांच्या विक्रमी कालावधीत म्हणजेच ३० मे २००३ रोजी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने पूर्णत्वास नेऊन फक्त राजधानी पणजीच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात एक चर्चेचा विषय बनवून टाकला होता.
नवीन पणजी बाजार प्रकल्प हा फक्त गोव्यातच नव्हे तर शेजारी राज्यांंसाठीही एक आधुनिक प्रकल्प ठरला याबाबत दुमत नव्हते.प्रशस्त, हवेशीर, बाजारात खरेदीसाठी येणारे ग्राहक व मालाची ने आण करण्यासाठी योग्य आणि रुंद मार्ग तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही परिपूर्ण असा हा प्रकल्प होता.या प्रकल्पाच्या बांधकामासंबंधी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रकल्प महापालिकेच्या थेट हस्तक्षेपाविना बांधण्यात आला होता. श्री. पर्रीकर यांच्या या दृष्टिकोनामुळेच हा प्रकल्प सात महिन्यांच्या अल्प कालावधीत प्रत्यक्षात उतरविणे शक्य झाले होते.
बाजाराच्या उद्घाटनापूर्वी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोवेकरांना तसेच "पणजीकारांना' हा बाजार महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर तो अडीअडचणी व गुंतागुंत न करता तसेच स्वच्छतेच्या बाबतीत योग्य प्रकारे हाताळता येईल का, असा प्रश्न तेव्हा पडला होता. आगामी काळात मासळी, फुले, भाजी, व फळांच्या बाजारात येणाऱ्यांना योग्य प्रकारे खरेदी करणे शक्य होईल काय, असा प्रश्न पडला होता.हे प्रश्न त्यावेळी जरी अप्रासंगिक व चांगल्या प्रकल्पाच्या विरोधी मोहिमेतले असले तरी आज पाच वर्षानंतर त्यावेळी मनात घर केलेले हे प्रश्न अर्थपूर्ण होते असे दिसून येते.एखादा चांगला सार्वजनिक प्रकल्प जर योग्य पद्धतीने पुढे जायचा असेल तर त्याची योग्य ती देखभाल होणे तेवढेच गरजेचे असते.मात्र पणजी महापालिकेच्या सार्वजनिक हितापेक्षा आपमतलबी धोरणामुळे या बाजाराची दुर्दशाच होत चालल्याचे चित्र पाहायला मिळते."बाप्पा' ऊर्फ अशोक नाईक जोपर्यंत पणजीच्या महापौरपदी होते तो पर्यंत नवीन बाजारातील व्यवस्था नियंत्रणाखाली होती, यात शंका नाही.. कालांतराने बदल घडत गेले व त्यांचे अनिष्ट परिणाम दिसू लागले.जुन्या बाजाराची एकूण जागा अंदाजे ८६६५ चौरस मीटर होती. बाजारातील वर्दळ, पार्किंग, सुविधा आणि भविष्यातील विस्तार नजरेसमोर ठेवून बाजार प्रकल्पाच्या सर्व टप्यांसाठी १३,७७८ चौरस मीटर जागेसह बाजार बांधकामाची जागा अंदाजे २१८३०.८२ निश्चित करण्यात आली. (यात मेझनाईन व बेसमेंटचाही समावेश आहे.)बाजार पुनर्वसनात महापालिका आणि बाजार समितीने अंतर्भाव केलेल्या विक्रेत्यांचा समावेश होतो. विक्रेत्यांना व्यापार आणि मालकी / कायदेशीर दर्जा प्रमाणे विभागण्यात आले आहे.एकूण १,३७७ वेगवेगळ्या विक्रेत्यांना त्यांचा व्यापार व जागेप्रमाणे नवीन बाजार इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्याचे लहान मोठे विक्रेते, त्यांचा दर्जा याचा सखोल अभ्यास करून स्थलांतरावेळी येणाऱ्या बाबींचाही अभ्यास करण्यासाठी व्हिडीओ फिल्मिंग करण्यात आले होते.पहिल्या टप्यातील स्थलांतर सुरळीतपणे झाले; तथापि, त्यानंतर बाजार समितीत काही आपमतलबी शिरल्यानंतर जनहित मागे पडले.लहान पारंपरिक विक्रेते जे ऊन्हापावसात आपली रोजीरोटी कमावत होते त्यांना बाजूला सारून नवीन बाजारात भलत्यांनाच जागा दिल्याने या प्रकल्पाचा मूळ हेतूच नष्ट झाला. जुन्या बाजारात कमी जागेत व्यापार करणाऱ्या बऱ्याच व्यापाऱ्यांना मोठी जागा देण्यात आली. सुयोग्य व मोक्याची जागा देण्यासाठी भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब केल्याचे सर्रासपणे बोलले जाऊ लागले. दरम्यान, पार्किंग घोटाळाही झाला.विक्रेत्यांनी बाजार समितीच्या एका सभासदालाही याप्रकरणात आपला हिसका दाखवला. सध्या विक्रेत्यांनी बाजारातील मोकळी जागा व्यापून जो गोंधळ निर्माण केला आहे त्यास पालिकाच पूर्णतः जबाबदार आहे व या गोंधळावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला अपयश आले आहे. बाजार समितीवर "गोलमाल' करणारी माणसे आहेत व नगरपालिकेच्या प्रमुखपदी अकार्यक्षम व्यक्ती बसल्या असताना त्यांच्याकडून आणखी कसली अपेक्षा करायची, असा प्रश्न सामान्य करीत आहे. कुंपणानेच जर शेत खाल्ले तर कोणाला जबाबदार धरणार,असा प्रश्न विक्रेते करीत आहेत.
आज हा प्रकल्प राजधानी शहराची डोकेदुखी बनला आहे.या बाजारातील वऱ्हांड्याची जागा मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वतःचा माल ठेवण्यासाठी व्यापली आहे. तेथे कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. स्वच्छता केवळ नावापुरती केली जाते. बाजाराची परिस्थिती अतिशय वाईट बनत चालल्याचे दृष्टीस पडते.धेंपो हाउस व कामत सेंटर समोरील विक्रेत्यांचे स्थलांतर हे सध्या मोठे आव्हान आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असलेल्यांची गरज आहे; जेणेकरून रोजीरोटी कमविणाऱ्या पारंपरिक लहान विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही. बाजार प्रकल्पाची जागा भव्य आहे; मात्र त्याची वाटणी चुकीची व मनमानीपणाने करण्यात येत आहे.ज्या मोठ्या व्यापाऱ्यांनी गैरमार्गाने विशाल जागा व्यापलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व जे अनेक वर्षांपासून आपला धंदा करून उदरनिर्वाह चालवत आहे त्यांना उचित न्याय देणे या दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.
विद्यमान महापौर व सध्याच्या विविध बाजार समित्यांमध्ये सद्सद्विवेक बुद्धीस स्मरून विक्रेत्यांना सामोरे जाण्याचे धाडस आहे काय, हाच आजचा लाखमोलाचा प्रश्न बनला आहे.

No comments: