Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 August, 2008

अभिनवने रचला इतिहास! ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्ण

बीजिंग, दि. ११ : भारतीय क्रीडाविश्वासाठी सोमवार सुवर्णदिन ठरला. निमित्त होते आतापर्यंतच्या इतिहासात भारताला ऑलम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा.
अभिनवने १० मीटर एअर रायफल प्रकारात ही सुवर्णमयी कामगिरी करून दाखवली.अंतिम फेरीत लाजवाब खेळाचे प्रदर्शन करत त्याने सरासरी १०.४५ गुण मिळवले. या स्पर्धेत त्याचे एकूण सरासरी ७००.५ गुण झाल्यामुळे तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
या सामन्यात दुसऱ्या स्थानावर राहून रौप्यपदक पटकावणारा अथेन्स ऑलम्पिक २००४ चा सुवर्ण पदक विजेता चीनचा झ्यु क्वायनान याने सरासरी ६९९.७ गुण मिळवले. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या फिनलंडच्या हेन्री हक्कीनेन याने तिसरे स्थान मिळवत कास्य पदक पटकावले.
आज सकाळच्या फेरीत अभिनव चौथ्या स्थानावर होता. यावेळी हेन्री ५९८ गुण मिळवत पहिल्या स्थानावर होता, तर अभिनव ५९६ गुणांसह २ गुणाने मागे होता. या स्पर्धेतील अंतिम फेरीत अभिनवने उत्तम कामगिरी केली. या फेरीत १०.७ गुण मिळवत आघाडी घेतली यानंतर त्याने १०.० आणि १०.८ गुण मिळवत एकूण सरासरी १०.४५ गुण मिळवले . या फेरीत हेन्रीचे एकूण सरासरी १०.१४ गुण होते.
या स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा चीनचा नेमबाज झ्यु क्वायनान मात्र पदक स्वीकारण्यासाठी आला व त्याला अश्रू आवरता आले नाहीत. त्यामागे कारणही तसेच होते त्याने २००४ सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले होते. आज झ्युला सुवर्ण पदक मिळाले असते तर या खेळ प्रकारात सलग दोन वर्ष सुवर्ण पदक मिळवून त्याला विश्वविक्रम स्थापित करता आला असता.
भारताला १९८० साला पासून सुवर्ण पदकाची प्रतीक्षा होती. २८ वर्षापूर्वी भारताला हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळाले, पण वैयक्तिक गटात भारताला आजपर्यंत सुवर्णपदक मिळाले नव्हते ते स्वप्न आजच्या अभिनवच्या कामगिरीने पूर्ण झाले.

No comments: