Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 August, 2008

क्रिकेट तिकीट घोटाळा नार्वेकरांविरुद्धच्या निवाड्यास स्थगिती

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): माजी मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांच्यावरील बनावट क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याच्या मडगाव सत्र न्यायालयाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज अंतरिम स्थगिती दिली. मात्र, त्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, नार्वेकर यांनी राजकीय स्थितीवर बोलण्याचे टाळून सर्व उत्तरे योग्य वेळी मिळतील असे स्पष्ट संकेत दिले.
बनावट तिकीट घोटाळाप्रकरणी मडगाव सत्र न्यायालयाच्या निवाड्याचे निमित्त पुढे करून कॉंग्रेस श्रेष्ठींनी नार्वेकर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे नार्वेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र यासंबंधी राजकीय विधान करणे योग्य होणार नाही, असे सांगून त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. ऍड. नार्वेकर यांचे वकील कार्लुस फरेरा यांनी आपली बाजू ऐकून घ्यावी व त्यानंतरच आरोपपत्रावर विचार व्हावा, अशी विनंती न्यायालयास केल्यानंतर खंडपीठाने तोपर्यंत त्या निवाड्याला अंतरिम स्थगिती दिली. याविषयीची पुढील सुनावणी येत्या दि. ९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
दि. ४ एप्रिल २००८ रोजी सत्र न्यायालयाने ऍड. नार्वेकर यांच्यासह अन्य संशयिताच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा निवाडा दिला होता. या निवाड्याला आव्हान देण्यासाठी ऍड. नार्वेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. दरम्यान, ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी कॉंग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या नार्वेकरांचाच काटा काढून एका दगडात दोन पक्षी मारले होते. नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडे देण्यासाठीच हा डाव साधल्याची चर्चा आता उघडपणे केली जात आहे. त्यांना पुन्हा मंत्रिपदावर आरूढ करावे लागले तरी वित्त खाते पुन्हा त्यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता कमीच आहे.
देवदर्शन केले आणि सुखद बातमी मिळाली...
नार्वेकर यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना आराम करणे भाग पडले आहे. हीच संधी कॉंग्रेसने साधली व त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पाडले अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस श्रेष्ठी जेव्हा त्यांच्याकडे आले होते तेव्हा किमान आठ दिवस वेळ देण्याची विनंती त्यांनी केली होती. या आठ दिवसानंतर क्रिकेट घोटाळा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी राजीनामा देण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. मात्र श्रेष्ठींनी ही विनंती फेटाळली व त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. दरम्यान, ही गोष्ट अजूनही नार्वेकरांना सलत आहे. पक्षाकडे एवढी वर्षे प्रामाणिक राहूनही अशा बिकट अवस्थेत आपल्याला ही वागणूक मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. "गेल्या आठवड्याभरात आराम केल्यानंतर आज पहिल्यांदाच आसगाव कायसुव येथे श्रावणी गुरुवारनिमित्त मठात गेलो व देवदर्शन घेऊन बाहेर येताच ही सुखद बातमी कानावर पडली', असेही त्यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.

No comments: