Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 August, 2008

पावसाचे थैमान सुरूच: दिवसभरात ३.२ इंच वृष्टी; दक्षिण गोव्यात जोरदार हानी, गोवा-बेळगाव महामार्ग बंदच

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) ः सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाने आज पाचव्या दिवशीही पावसाने झोडपले. ठीक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले होते. दक्षिण गोव्यात अनेक घरांवर वृक्ष पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली. गेल्या २४ तासांत ३.२ इंच तर आतापर्यंत एकूण ७६.९४ इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती पणजी वेधशाळेचे प्रमुख के व्ही. सिंग यांनी दिली. राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून ताशी सुमारे ७० कि.मी. वेगाने वाहतील, असेही श्री. सिंग यांनी सांगितले.
कालच्या तुलनेत आज दिवसभर पावसाचा जोर किंचित कमी झाला. तथापि, रात्री पुन्हा पावसाने आपला जोर वाढवला. वाळपई, मोरजी तसेच सावर्डे या भागातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात पोहोचणे बरेच कठीण झाले होते. अनेक ठिकाणी पावसाचा वाढता जोर पाहून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजताच घरी सोडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज तिसऱ्या दिवशीही मोले अनमोड महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू होते. उद्या मंगळवारपर्यंत हा महामार्ग सुरळीत होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वे मार्ग सुरळीत असल्याच दावा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला. मुंबई जाणाऱ्या अनेक बसेस आज रद्द झाल्याने मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे खचाखच भरल्या होत्या.
गेल्या पाच दिवसांपासून अनेक शेतात पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच खाण परिसरात खाणींवरील खनिजमिश्रीत पाणी शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------------
डिचोली तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना आज (मंगळवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
--------------------------------------------------------------------------------

No comments: