Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 April, 2008

आता भरारी पथक: कोर्टाच्या आदेशानंतर 'पणजी सुंदर होणार'

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पणजीत साचणाऱ्या घाणीविरोधात उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राजन पर्रीकर यांनी दाखल केलेली जनहित याचिका आज निकालात काढण्यात आली. शहरात सार्वजनिक ठिकाणी घाण किंवा उपद्रव करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने खास भरारी (फिरत्या) पथकाची स्थापना केली आहे. या पथकात पालिकेचे अभियंते तसेच दोन पोलिस हवालदार उपलब्ध केले जावेत, असे आदेशात म्हटले आहे.
शहरात पदपथांवर होणारे अतिक्रमणांविरोधात तसेच उद्यानात झोपणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या सुचनांचे पालन न केल्यास कोणती कारवाई होऊ शकते याबाबतचे फलक
सार्वजनिक ठिकाणी इंग्रजी तसेच स्थानिक भाषेत लावावेत, असे आदेशात म्हटले आहे. नागरिकांना तक्रार करण्यासाठी या फिरत्या पथकाचा मोबाईल क्रमांक सर्व वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करावा, अशी सूचनाही महापालिकेस करण्यात आली आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाणी लोक लघुशंका करीत असल्याने महत्त्वाच्या ठिकाणी प्रसाधनगृहे उभारावीत, तेथे जाण्यासाठी आकारली जाणारी रक्कम नगण्य असावी, त्यासाठी शुल्काची पुनर्रचना करावी. तसेच पदपथांवर अतिक्रमण करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाडे धारकांवर कारवाई करण्याचे अधिकार या फिरत्या पथकाला देण्यात आले आहे.
महापालिकेने स्वच्छ ठेवणार म्हणून जाहीर केलेल्या २२ सार्वजनिक जागांमध्ये अजून दोन उद्यानाची भर घालण्यात आली आहे. त्यात महापालिका उद्यान आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर असलेली उद्यानांचा सार्वजनिक उद्यान म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पणजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहे, कुजलेली मासळी मांडवी नदीत टाकली जाते, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली जाते या कारणांस्तव डिसेंबर २००७ मध्ये राजेंद्र पर्रीकर यांनी खंडपीठात जनहित याचिका सादर केली होती. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून छायाचित्रेही न्यायालयासमोर सादर केली होती. याची न्यायालयाने गंभीर दखल घेत याचिका दाखल करून घेतली होती. त्यानंतर न्यायालयाकडून पणजी महापालिकेला ४८ तासांत सारे शहर स्वच्छ करा, असा आदेश देण्यात आला होता. शहरात परप्रांतीयांचा भरणा होत आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच मांडवी नदीच्या काठावर नैसर्गिक विधी उरकले जातात. आझाद मैदानाच्या ठिकाणी पदपथांवर भंगार अड्डे उभारण्यात आले आहेत, असे याचिकेत नमूद केले होते. याची दखल घेऊन न्यायालयाने पणजी महापालिकेला आणि सरकारला नोटीस बजावली होती. त्यावेळी पालिकेने शहरातील सर्व घाण साफ केल्याचे उत्तर न्यायालयात सादर केले होते. घाणीचे ढीग शहरात अजून कायम आहेत व मांडवी नदीत कुजकी मासळी टाकली जात असल्याचेही पुरावे सादर केले होते. सावर्र्जनिक ठिकाणी लघुशंका केली जाते आणि स्मारकांच्या ठिकाणी दुपारी काही व्यक्ती झोपत असल्याचे छायाचित्राद्वारे याचिकादाराने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

No comments: