'मान्यताप्राप्त' ज्वालामुखी
म्हापसा करासवाडा येथील बेकायदा उभे राहिलेले हे भंगार अड्डे म्हणजे "ज्वालामुखी' बनल्याचे वृत्त अलीकडेच "गोवादूत'मध्ये प्रसिद्ध झाले होते. सर्व सरकारी कायदे व नियम पायदळी तुडवून उभे राहिलेले हे अड्डे म्हणजे भ्रष्ट प्रशासकीय कारभाराचे उघड दर्शनच असून काही राजकीय नेत्यांचा आश्रय या अड्ड्यांना मिळत असल्याचा जाहीर आरोप स्थानिकांकडून होत आहे.
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): म्हापसा करासवाडा येथील राष्ट्रीय महामार्गाला टेकून असलेला एक भंगार अड्डा आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडता-पडता बचावला. विद्युत वाहिन्यांच्या ठिणगीमुळे लागलेली ही आग ताबडतोब आटोक्यात आणण्यात तेथील लोकांना यश आले. त्यामुळेे मोठा अनर्थ टळला. तथापि, या घटनेमुळे पुन्हा एकदा या भंगार अड्ड्यांचा धोका ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी म्हापसा अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी येथील अड्ड्यावरून जाणारी वीजवाहिनी तुटल्याने त्याद्वारे उसळलेल्या ठिणग्यांमुळे भंगार अड्ड्यातील सामानाने पेट घेतला. हा प्रकार तेथील लोकांच्या लगेच लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. यापूर्वीही या अड्ड्याला आग लागली होती. अग्निशमन दलास बोलावण्यात आले, परंतु बंब येण्यापूर्वीच ही आग विझवण्यात आली होती.
उच्च न्यायालयाकडून अशा प्रकारच्या भंगार अड्ड्यांबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही सरकारी खात्यांकडून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे आता न्यायसंस्थाच या धोक्यापासून लोकांना सुरक्षा देऊ शकते, असे लोकांचे म्हणणे आहे.
Sunday 20 April, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment