Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 April, 2008

वेड्याचे सोंग घेतलेला अट्टल गुन्हेगार अटकेत

मडगाव, दि.२२ (प्रतिनिधी): कोलवा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा पेडा वार्का येथे वेडसर अवस्थेेत भटकणाऱ्याला संशयावरून केलेली अटक ही कर्नाटक पोलिसांसाठी सनसनाटीपूर्ण आणि दिलासादायी बातमी ठरली. कारण हातबॉंब बाळगल्या प्रकरणी दोषी ठरवून बंगलोर उच्च न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा चुकवण्यासाठी तो वेड्याचे सोंंग घेऊन भटकत आहे. कोलवा पोलिसांनी त्याला मडगाव येथे पोलिस कोठडीत डांबून कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला असून भटकळ पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी इकडे येण्यास निघाले आहेत. तो सध्या दोन दिवसांच्या रिमांडवर आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे नाव ज्यु चाको उर्फ विजू असे असून तो कर्नाटक -केरळ सीमेवरील गावात रहाणारा आहे. रविवारी रात्री कोलवा पोलिसांनी संशयावरून त्याला हटकले असता बराच वेळपर्यंत त्याने आपण भ्रमिष्टावस्थेत असल्याचा आव आणून पोलिस चौकशीला दाद दिली नाही. पोलिसही कंटाळून त्याला तेथेच सोडून जाण्याच्या अवस्थेत असताना त्यांना वेडेपणाचे सोंग वठवणाऱ्या एका अट्टलअतिरेक्याची आठवण झाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला उचलून जीपगाडीत टाकले व कोलवा पोलिस स्थानकात आणून चौकशी सुरू केली. रात्रभर त्याने काहीच थांगपत्ता लागू दिला नाही . मात्र काल सोमवारी त्याचा वेडेपणाचा मुखवटा गळून पडला व त्याचे असली रूप समोर आले.
१९९७ मध्ये कारवार पोलिसांनी त्याला हातबॉंब जवळ बाळगल्याबद्दल अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याला या वेडेपणाच्या मुद्यावरून दोषमुक्त केले होते. नंतर बंगलोर उच्च न्यायालयाने तो आदेश रद्दबातल ठरवून त्याला दोन वर्षे सक्तमजुरी ठोठावली होती. एरवी वेडेपणाचे सोंग घेतलेला हा आरोपी तो निवाडा कानी पडताच कर्नाटकातून सटकला व आडमार्गाने गोव्यात पोचला. येथेही तो भटकंती करीत होता. याकामी त्याला हे वेडेपणाचे सोंग फायदेशीर ठरले.
कोलवाचे निरीक्षक एडविन कुलासो यांनी सांगितले, केरळमधील एका मंदिरावर केलेल्या हल्याप्रकरणी त्याने ५ वर्षे तुरुंगात काढली असून तोअट्टल गुन्हेगार आहे.
त्यामुळे अशा प्रकारची नाटके करणारे किती गुन्हेगार गोव्यात वावरत असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. पर्यटन व कामाच्या नावाखाली मेाठ्या प्रमाणात परप्रंातीयांचे लोंढे गोव्याकडे येत असून त्यात बेमालूम मिसळून अनेक गुन्हेगार गोव्यात येत असावेत, अशी शक्यता आहे. त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे यावरुन स्पष्ट होत चालले आहे.

No comments: