Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 April, 2011

बाबूशना डच्चू देईपर्यंत भाजपचा लढा : पार्सेकर

• गावागावांत विषय नेणार
• उद्यापासून भाजपची मोहीम

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): करोडो रुपयांचे बेहिशेबी विदेशी चलन दुबईला घेऊन जाताना मुंबई विमानतळावर जकात विभागाच्या हाती आलेले गोव्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत मंत्रिमंडळातून जोवर डच्चू देत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार आहे, असे आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मंगळवार ५ एप्रिलपासून हा विषय घेऊन गावागावांत उतरणार आहेत. तसेच उद्या (सोमवारी) गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेतली जाणार असल्याचे श्री. पार्सेकर यांनी सांगितले.
त्याप्रमाणे, तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणण्याचाही विचार असल्याचे प्रा. पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. सदर घटना घडून ३६ तास उलटून गेले तरीदेखील मुख्यमंत्री दिगंबर कामत हे एक चकार शब्दही काढत नसल्याने बाबूश यांच्या त्या बॅगेत मुख्यमंत्र्यांचेही पैसे असावेत, असा आरोप श्री. पार्सेकर यांनी यावेळी केला.
प्रा. पार्सेकर आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर उपस्थित होते. कॉंग्रेस सरकारच्या या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी गेल्या चार वर्षात किती वेळा, कोणत्या कारणासाठी विदेश दौरे केले, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर उघड करण्याची मागणी करीत या विदेश दौर्‍यांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातून परवानगी मिळाली होती का, याचीही माहिती दिली जावी, अशी मागणी पार्सेकर यांनी केली.
हे प्रकरण काळ्या धनाशी जोडलेले आहे. त्यामुळे लोकसभेतही त्यावर आवाज उठवला जाणार आहे, असे यावेळी खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
कोणत्याही मंत्र्याला विदेशात जायचे असल्यास त्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय तसेच, मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यात विधानसभा सुरू असल्यास सभापतींचीही संमती घेणे गरजेचे असते. त्यामुळे शिक्षणमंत्री मोन्सेरात यांनी या सर्वांची परवानगी घेतली होती का, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी, असे खासदार नाईक यावेळी म्हणाले. गेल्या चार वर्षापासून हे मंत्री उठसूट विदेशवार्‍या करीत आहेत. त्यांचे अनेक व्यवसायही त्याठिकाणी सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाचे हॉटेलचे बांधकाम सुरू आहे तर, काहींनी समुद्र किनार्‍यावर फ्लॅट घेतले आहेत, अशी माहिती हाती आली असल्याचेही श्री. पार्सेकर यांनी यावेळी सांगितले.
या घटनेमुळे देशस्तरावर तसेच जागतिक स्तरावरही गोव्याची बदनामी झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. हा पैसा बाबूश यांच्याकडे कसा आला? बाबूश हे सदर पैसा दुबई येथे कशासाठी घेऊन जात होते, याचीही माहिती लागली पाहिजे, अशी मागणी प्रा. पार्सेकर यांनी केली.
बाबूश यांचा दावा
तब्बल ४८ तासांनंतर शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्याकडे मुंबई विमानतळावर सापडलेले विदेशी चलन हे हिशेबी असून ते केवळ २१ लाख रुपये असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रातील, महाराष्ट्रातील आणि गोव्यातील कॉंग्रेस सरकार या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच, मुंबई जकात खात्याचे आयुक्त तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी आर. एस. सिद्धू आणि गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्ध हे जवळचे नातेवाईक असल्याचेही बोलले जात आहे.
बाबूश यांनी आपल्याकडे २१ लाख रुपये असल्याचा दावा केला असला तरी कालपर्यंत या पैशांबद्दल जकात खात्याला समाधानकारक उत्तरे मिळालेली नव्हता. त्यामुळे बाबूशना सर्व कागदपत्रांसह येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांच्या मित्राचाही पासपोर्ट जप्त केला आहे. तसेच, बाबूश यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे करोडो रुपयांचे विदेशी चलन सापडलेे असल्याची माहिती कस्टम अधिकार्‍यांनी राष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना दिली होती. त्यामुळे त्या कस्टम अधिकार्‍यांनी सांगितलेली रक्कम आणि बाबूश यांनी केलेला दावा यात फरक आढळून येत आहे.
‘मी विविध चलनातील केवळ २१ लाख रुपये घेऊन दुबईला निघालो होतो. यावेळी माझ्याबरोबर माझा मुलगा आणि मित्रही होता’ असे श्री. बाबूश यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. तसेच, गेल्यावर्षी लंडन येथे हॉटेल विकत घेण्याचा विचार होता तेव्हा तेथे जाताना आपण २५ हजार डॉलरचा ‘ट्रॅव्हल चेक’ बनवला होता. तो धनादेश माझ्याकडे अजूनही असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त ७५ हजार दिनार आणि भारतीय ६३ हजार रुपये दुबईला जाताना आपल्याबरोबर होते. असे श्री. मोन्सेरात यांनी सांगितले.
पर्यटन व्हिसावर एवढी मोठी रक्कम घेऊन जाता येत नाही, याची आपल्याला कोणी कल्पना दिली नव्हती, असाही युक्तिवाद त्यांनी केला आहे. रशिया आणि जपान या राष्ट्रात जातानाही हा धनादेश बरोबर घेऊन गेलो होतो. परंतु, तो खर्च करण्यात आला नव्हता, अशीही माहिती त्यांनी पुढे दिली.
जर बाबूश यांच्याकडे केवळ २१ लाख रुपयेच होते तर जकात अधिकार्‍यांनी त्यांची सुमारे ६ तास चौकशी का केली. तसेच, त्यांच्या मित्राचा पासपोर्ट जप्त करून दि. ८ एप्रिल रोजी पुन्हा चौकशीसाठी का बोलावले, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. दरम्यान, कॉंग्रेस पक्षातील असंतुष्ट आमदार या संधीचा लाभ घेण्यासाठी सक्रिय झाले आहे.

No comments: