Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 April, 2011

अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार नमले!


- सर्व मागण्या मान्य!
- उद्या उपोषण सोडणार


नवी दिल्ली, दि. ८
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारने नमते घेतले असून आज शुक्रवारी त्यांच्या सर्व मान्य केल्या आहेत. त्यानुसार, अण्णा हजारे यांनी उद्या शनिवारी सकाळी १० वाजता आपण आरंभलेले आमरण उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, प्राप्त वृत्तानुसार जन लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणार्‍या प्रस्तावित संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि सह अध्यक्षपदी माजी केंद्रीय कायदा मंत्री शांती भूषण असतील. या समितीत स्वतः अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, संतोष हेगडे आणि प्रशांत भूषण यांचाही समावेश असणार आहे. लवकरच हा मसुदा अधिसूचित केला जाणार आहे.
अण्णा हजारे यांनी आज केलेल्या या घोषणेमुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गेले चार दिवस निर्माण झालेली कोंडी फुटली आहे. हजारे यांचे प्रतिनिधी अरविंद केजरीवाल आणि स्वामी अग्निवेश यांची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल, कायदामंत्री विरप्पा मोईली आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांच्याशी झालेली चर्चा सफल झाल्यावर हजारेंनी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेणार असल्याची घोषणा केली.

लोकपाल विधेयकाबाबत अण्णांनी सरकारपुढे पाच मागण्या ठेवल्या होत्या. विधेयकाचा मसुदा तयार करणार्‍या समितीवर सरकारचे पाच आणि आमचे पाच प्रतिनिधी असावेत. सरकारी प्रतिनिधी समितीच्या अध्यक्षपदी असल्यास आपला प्रतिनिधी उपाध्यक्ष असावा आणि दोघांकडे समान अधिकार असावेत, अशी मागणी देखील अण्णांनी केली होती. समितीवर असणारे सर्व सरकारी प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचे असावेत, त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप असू नये, तसेच समितीच्या स्थापनेबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, असेही अण्णांनी सांगितले होते. अण्णांच्या या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

No comments: