Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 April, 2011

ट्रकचालक नव्हे, हे यमदूतच!

परवान्याअभावी वर्षभरात ३७७० ट्रकचालकांना दंड
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
राज्यातील विविध रस्त्यांवर ट्रक नव्हे तर साक्षात यमदूतच धावत असतात, अशी परिस्थिती विधानसभेत मिळालेल्या एका माहितीवरून स्पष्ट झाली आहे. गेल्या एका वर्षांतच एकूण ३७७० ट्रकचालकांना परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) नसताना ट्रक चालवल्याबद्दल राज्य वाहतूक खात्यातर्फे दंड ठोठावण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
राज्यातील विविध खाण प्रभावित क्षेत्रांत परवान्याशिवाय खनिजवाहू ट्रक हाकण्याचे काम परप्रांतीय चालक मोठ्या प्रमाणात करीत असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. या ट्रक चालकांचे परवाने तपासण्याची कोणतीच यंत्रणा राज्य परिवहन खात्याकडे नाही; मात्र, त्याबाबत व्यापक सर्वेक्षण करण्याची तयारी खात्याने दर्शवली आहे.
राज्यात एकीकडे खनिज ट्रकांमुळे रस्ता अपघातांची संख्या वाढत असतानाच सरकार मात्र त्याबाबत बेफिकीर असल्याचेच चित्र अतिशय धोकादायक आहे. सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी एका तारांकित प्रश्‍नाव्दारे ही माहिती मिळवली आहे. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात गेल्या वर्षभरात एकूण ३७७० ट्रक चालकांना वाहन चालक परवाना नसल्याने खात्याने दंड ठोठावला आहे. केंद्रीय मोटर वाहन कायदा, १९८८ नुसार देशात कुठेही काढलेला परवाना ग्राह्य ठरतो व त्यामुळे या चालकांना इथे वाहन चालक परवाना नव्याने काढायला लावणे शक्य होत नसल्याचेही या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत मिळून ८७८४ विविध प्रकारच्या वाहन चालकांना परवान्याअभावी दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात २०१० साली सर्वाधिक १६,५०,१०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

No comments: