Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 April, 2011

युवक कॉंग्रेसवरील हल्ल्याची गृह खात्याकडे नोंदच नाही?

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
ताळगावात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची कोणतीच नोंद गृह खात्याकडे नाही, अशी खळबळजनक माहिती गृहमंत्री रवी नाईक यांनी एका तारांकित प्रश्‍नावर दिली आहे. हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह खात्याने ही भूमिका घेतल्याने बरेच वादळ उठले आहे. बाबूश मोन्सेरात यांची पाठराखण करण्यासाठीच कॉंग्रेस पक्षाकडून युवक कॉंग्रेसला वार्‍यावर सोडून दिल्याचेच यावरून उघड झाले आहे.
दोनापावला येथील नियोजित ‘आयटी हॅबिटॅट’ प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी युवक कॉंग्रेसने १८ डिसेंबर २००७ रोजी ताळगावात रॅलीचे आयोजन केले होते. ताळगावचे तत्कालीन आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. या रॅलीप्रसंगी पोलिसांच्या उपस्थितीतच बाबूश समर्थकांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले होते. या हल्ल्यात खुद्द युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर व इतरांच्या वाहनांचीही अपरिमित नासधूस करण्यात आली होती. या हल्ल्याचे वृत्तांकन स्थानिक प्रसारमाध्यमांत तर झाले होतेच; परंतु आजही या हल्ल्याची क्षणचित्रे ‘यूट्यूब’वर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात माजी केंद्रीय कायदामंत्री तथा विद्यमान कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांचे पुत्र आश्‍विन खलप तसेच दक्षिण गोव्याचे युवक कॉंग्रेस नेते चिदंबर चणेकर यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेची रीतसर तक्रार संकल्प आमोणकर यांनी पणजी पोलिस स्थानकात करूनही हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. खुद्द या घटनेनंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या समर्थकांनी केलेल्या कृतीचे जाहीर समर्थन केले होते.
दरम्यान, गृह खात्याने या प्रकरणी हात झटकून युवक कॉंग्रेसला पूर्णपणे वार्‍यावर सोडल्याचेच सिद्ध झाले आहे. युवक कॉंग्रेसतर्फे सध्या राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवरच गृह खात्याकडून हा पवित्रा घेण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, ताळगाव येथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची छायाचित्रे व व्हिडिओ फुटेज उपलब्ध असतानाही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. या हल्ल्यात सामील असलेले काहीजण सध्या पणजी महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडूनही आले आहेत.
जाळपोळीची पूर्वकल्पना होती
दोनापावला येथील आयटी हॅबिटॅट जाळपोळ प्रकरणी सरकारला पूर्वकल्पना देण्यात आली होती व याबाबत खुद्द अन्य एका प्रश्‍नावर दिलेल्या उत्तरात सरकारनेही होकार दिला आहे, अशी माहिती ऍड. नार्वेकर यांनी दिली आहे. आपण स्वतः याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना फोन करून माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. एवढे करूनही या जाळपोळ प्रकरणी कोणतेही पुरावे सापडत नाहीत, असे कारण पुढे करून या प्रकरणाची फाईलच बंद करण्याची कृती कितपत योग्य आहे, याचा निर्णय सरकारनेच घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.

No comments: