Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 April, 2011

हे स्मगलरांचे सरकार!

पणजीतील जाहीर सभेत भाजपचा आरोप
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
बाबूश मोन्सेरात प्रकरणावरून पडलेल्या या ठिणगीमुळे लवकरच वणवा पेटणार असून येत्या गुढीपाडव्यापर्यंत या कॉंग्रेस सरकारचा सत्यानाश होणार असल्याची खात्री आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. तसेच, दिगंबर कामत यांचे कॉंग्रेस सरकार हे ‘स्मगलरां’चे सरकार असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
मंगळवारी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन भारतीय जनता पक्षाने पणजीत मोर्चा काढला. या मोर्चाचे आझाद मैदानावर जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पर्रीकर बोलत होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पुतळ्याचे दहन केले. मोर्चात संपूर्ण गोव्यातील पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच या सर्व तस्करांचे म्होरके आहेत. मात्र, तस्करीमागे त्यांचा उद्देश मात्र नेहमीच चांगला असतोे, अशी खिल्लीही पर्रीकर यांनी उडवली. बाबूशवर आत्तापर्यंत १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झालेले आहेत. जुने गोवे येथे पैशांसाठी जंगलातील सागवानाचे वृक्ष कापले होते, हा त्यांचा पहिला गुन्हा होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर बाबूशचे पाय सागवानाच्या जंगलात दिसले होते, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. बाबूशने पोलिस स्थानकावर हल्ला केला, पोलिसांची डोकी फोडली, ताळगाव येथे आयटी हॅबिटॅट प्रकल्पाला आग लावून ४५ लाख रुपयांचे नुकसान केले, आपल्या विरोधात आवाज उठवणार्‍या ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्यावर हल्ला करून त्यांची बोटे छाटली, युथ कॉंग्रेसच्या अध्यक्षांसह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना झोडून काढले; गुंडगिरी आणि विदेशी चलनाची तस्करी करण्यात बाबूशशी कोणीही स्पर्धा करू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कॉंग्रेस सरकार चोर, दरोडेखोर आणि तस्करांचे सरकार आहे, अशी टीका यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. बाबूशला विदेशी चलनाची तस्करी करताना मुंबई विमानतळावर रंगेहाथ पकडून त्यांची १८ तास चौकशी केली. आता कॉंग्रेसचे सर्व मंत्रिमंडळ त्यांना पाठिंबा देत असल्याने या सर्वांचेच पैसे त्यात गुंतले असल्याची शक्यता असून या भ्रष्ट मंत्रिमंडळाच्या भानगडी त्यांना माहीत असल्यानेच सर्वांकडून त्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप श्री. पार्सेकर यांनी केला.
कॉंग्रेसचा भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशांची लूट थांबवण्यासाठी गोव्यातील जनतेने आता आक्रमक व्हावे; हे सगळे औरंगजेबाचेही बाप झाले असून त्यांना आत्ताच लगाम घातला पाहिजे, असे आवाहन उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. बाबूशकडे एवढे पैसे आले कुठून, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बाबूशची खाण नाही किंवा कारखानाही नाही. यापूर्वी त्यांनी असा किती पैसा विदेशी बँकांत जमा केला आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी श्री. नाईक यांनी केली.
निवडणुकीचा काळ जवळ आला आहे. त्यामुळे जनतेने केवळ एका मंत्र्यालाच नव्हे तर भ्रष्टाचारात लडबडलेल्या संपूर्ण कॉंग्रेस मंत्रिमंडळालाच घरी पाठवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. आम्हांला वाटले होते, केंद्रातीलच कॉंग्रेस नेत्यांचे पैसे स्विस बँकेत आहेत. परंतु, बाबूश याला विमानतळावर ताब्यात घेतले आणि गोव्यातील कॉंग्रेस मंत्र्यांचेही विदेशी बँकांत काळे धन असल्याचे उघड झाल्याचे श्री. डिसोझा म्हणाले. खारीवाड्यावरील लोकांसाठी हे सरकार काहीही करीत नाही; पण आपल्या एका मंत्र्याची सुटका करण्यासाठी विधानसभाच तहकूब करतात. घाईगडबडीत चर्चेविना मागण्या मान्य करून घेतात, हा कॉंग्रेसचा खरा चेहरा असल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदा चोडणकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांनी आपली मते व्यक्त केली. पक्षाचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सूत्रसंचालन केले.

No comments: