Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 April, 2011

मंत्रिपद तर जाणारच पण सत्ताधार्‍यांकडूनच बाबूशची अशीही ‘गेम’

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे स्पष्ट आदेश कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याची खात्रीलायक माहिती कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. या संदर्भातच राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना काल काबो राजभवनावर बोलावून घेतले होते. मात्र, विधानसभा अधिवेशन काळात विरोधक व सरकारातीलच नार्वेकरांनी सरकारचे जे वस्त्रहरण चालवले होते त्यामुळे पुरती अब्रू जाण्याचा धोका लक्षात घेऊन बाबूश यांना काही काळ अभय देण्याची चाल सत्ताधारी खेळले व बाबूशचीच वेगळ्या अर्थाने ‘गेम’ केली अशी माहितीही समोर आली आहे.
विदेशी चलन तस्करी प्रकरणी बाबूश यांना मुंबई कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद दिल्लीतही उमटले आहेत. या विषयावरून केंद्रातही भाजपने जोरदार आवाज उठवण्याची तयारी सुरू केल्याने त्यापूर्वीच बाबूश यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याची तयारी कॉंग्रेस श्रेष्ठींनी चालवली आहे. विधानसभेत विनियोग विधेयकावरील चर्चेत सरकारचे पूर्ण वस्त्रहरण होणार या भीतीने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बाबूश यांना अभय दिल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आपला पवित्रा बदलणार नाही, याची माहिती मिळाल्यानेच त्याचा लाभ उठवून गोंधळातच चर्चेविना विनियोग विधेयक संमत करून घेण्यात मुख्यमंत्री कामत यांनी यश मिळवले. येत्या सोमवारपर्यंत बाबूश यांना मंत्रिपदावरून खाली खेचण्यात येईल, अशी भविष्यवाणीही सदर नेत्याने केली आहे.
बाबूश आज मुंबई कस्टमसमोर
दरम्यान, बाबूश मोन्सेरात हे उद्या ८ रोजी मुंबई कस्टम अधिकार्‍यांसमोर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. विदेशी चलन तस्करी प्रकरणी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठीच त्यांना उद्या मुंबईत पाचारण करण्यात आल्याचे समजते. केंद्र सरकारकडून मुंबई कस्टम अधिकार्‍यांवर दबाव टाकून हे प्रकरण मिटवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी त्यांच्याकडून ‘फेमा’ व कस्टम कायद्याचेही उल्लंघन झाल्याने त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणे जिकिरीचेच ठरेल, असा निष्कर्ष कॉंग्रेस श्रेष्ठींनी काढल्याची खबर आहे.

No comments: