Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 February, 2011

बाबूंकडूनही पेडण्याची घोर उपेक्षा

‘आरटीआय’चा दणका; १७४ पैकी केवळ २२ पदे पेडण्याला
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): सत्ता मिळाल्याशिवाय पेडणे तालुक्याचा विकास होणे शक्य नाही असे निमित्त पुढे करून भाजपचा त्याग करून कॉंग्रेसवासी झालेले मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांच्याकडून पेडणेवासीयांना मोठी अपेक्षा होती. परंतु त्यांच्याकडूनही पेडणे तालुक्याची घोर उपेक्षाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धारगळचे माजी पंचसदस्य तथा मगोचे युवा कार्यकर्ते नीलेश पटेकर यांनी माहिती हक्क कायद्याव्दारे प्राप्त केलेल्या माहितीनुसार बाबू आजगांवकर यांच्याकडील विविध खात्यांत गेल्या साडेतीन वर्षांत एकूण १७४ पदे भरण्यात आली. परंतु, त्यांतील फक्त २२ पदे पेडणे तालुक्याच्या पदरी पडल्याचे उघड झाले आहे.
धारगळचे आमदार व पंचायतमंत्री असलेले मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर हे पेडणे तालुक्याचे पालकमंत्रीही आहेत. पेडण्याचे विकासपुरूष असे त्यांचे वर्णन त्यांच्या समर्थकांकडून केले जाते. आत्तापर्यंत विकासापासून वंचित राहिलेल्या या तालुक्याचा विकास बाबूंमुळेच झाला व त्यांनी आत्तापर्यंत पेडण्यातील शेकडो युवकांना सरकारी रोजगार मिळवून दिला, असे ते स्वतः तथा त्यांचे कार्यकर्ते नेहमीच सांगत असतात. मात्र, या केवळ वार्‍यावरच्या गप्पा आहेत व प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती आहे याचा उलगडा माहिती हक्क कायद्यामुळे झाला आहे.
बाबू आजगांवकर यांच्याकडे प्रोव्हेदोरीया, पंचायत तथा क्रीडा खाते आहे. या तिन्ही खात्यांत मिळून १ जून २००७ ते ३१ डिसेंबर २०१० पर्यंत एकूण १७४ पदांची भरती झाली आहे. प्रोव्हेदोरीया-१९, पंचायत खाते- १२० व क्रीडा खात्यात-३५ पदांची भरती करण्यात आली आहे. या एकूण १७४ पदांपैकी पेडणे तालुक्याच्या नशिबी केवळ २२ पदे आली आहेत. विशेष म्हणजे या खात्यांतील भरतीत फोंडा, सासष्टी व तिसवाडी तालुक्यांतील उमेदवारांची जास्त भरती झाल्याचे उघड झाले आहे. प्रोव्हेदोरीया खात्यातील १९ पदांपैकी पेडणे तालुक्याला फक्त एक पद मिळाले आहे. पंचायत खात्यातील १२० पदांपैकी १२ तर क्रीडा खात्यातील ३५ पदांपैकी फक्त ९ पदे पेडण्यातील बेरोजगारांना मिळाली आहेत.
आत्तापर्यंत सरकारी नोकर भरतीत पेडणे तालुक्यावर अन्यायच झाला आहे. निदान बाबू आजगांवकर यांच्याकडून हा अन्याय दूर होईल व पेडण्यातील शेकडो बेरोजगारांना सरकारी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा येथील युवावर्ग बाळगून होता. सरकारातील अनेक मंत्री सध्या फक्त आपापल्या मतदारसंघातीलच लोकांचाच नोकर्‍यांत भरणा करीत असताना बाबू आजगांवकर यांनी मात्र पेडणे तालुक्यातील बेरोजगारांची घोर निराशाच केल्याचे बोलले जाते. बाबू आजगांवकर यांच्याकडील महत्त्वाच्या पंचायत खात्यात भरती केलेल्या एकूण ५६ ग्रामसेवकपदांपैकी केवळ ४ उमेदवार पेडण्यातील आहेत. २४ ‘एलडीसीपैकी -१, २९ कनिष्ठ अभियंत्यांपैकी -७ तर शिपाई व तांत्रिक साहाय्यकपदांसाठी पेडण्यातील एकाही उमेदवाराची निवड झालेली नाही.
कार्यकर्त्यांकडून दिशाभूल
नीलेश पटेकर यांनी उघड केलेली ही माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचल्याने बाबू आजगांवकर यांचे बिंगच फुटले आहे. बाबू आजगांवकर यांच्या काही समर्थकांनी खास पत्रकार परिषद आयोजित करून नीलेश पटेकर यांचा हा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष पांडुरंग परब, धारगळचे सरपंच भूषण नाईक, ऍड. मुरारी परब यांनी नीलेश पटेकर यांच्यावर तोंडसुख घेऊन ते जनतेची दिशाभूल करीत असल्याचा कांगावा केला होता. बाबू आजगांवकर यांनी पेडण्यातील उमेदवाराकडून सरकारी नोकरीसाठी एकही पैसा घेतला नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान, या कारणांमुळेच अधिकांश नोकर्‍या पेडण्याबाहेरील लोकांना देण्यात आल्या आहेत काय, असा सवाल करीत बाबू समर्थकांच्या या कृतीबद्दल तालुक्यातील युवावर्गाकडून जबरदस्त चीड व्यक्त केली जात आहे.

No comments: