Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 February, 2011

रसिकाला तिसर्‍यांदा जामीन नाकारला

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)
वाळपई येथील पोस्टमास्तर प्रकाश गाडगीळ यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेली संशयित आरोपी रसिगंधा ऊर्फ रसिका शेटये हिचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी तिसर्‍यांदा फेटाळून लावला. संशयित रसिगंधा हिच्या विरुद्ध भक्कम पुरावे आहेत; तसेच ती गाडगीळ यांच्याकडे पैशांची मागणी करीत होती, हेही सिद्ध होत असल्याने तिला जामीन मंजूर करू नये, असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील सुभाष सावंत देसाई यांनी केला.
संशयित रसिका हिला १८ ऑगस्ट २०१० रोजी अटक करण्यात आली होती. गाडगीळ यांचे मोबाईलवर अश्‍लील छायाचित्र काढून संशयिताकडून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. तसेच, त्यांच्याकडून दीड लाख रुपयेही उकळण्यात आले होते. त्यानंतर तिने दोन मारुती आल्टो कारची मागणी लावून धरल्याने गाडगीळ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्रही लिहून ठेवले होते. त्यात त्यांनी रसिगंधा हिच्या छळाला कंटाळूनच आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. या पत्रातील हस्ताक्षराची ओळख हस्ताक्षरतज्ज्ञांनी पटवली आहे. तसेच, गाडगीळ यांच्या पत्नीनेही रसिगंधा हिच्या विरोधात महत्त्वाची जबानी दिली आहे. तिला आपल्या पतीने भविष्य निर्वाह निधीतील दीड लाख रुपये काढून दिले होते. ती रक्कम तिच्या खात्यावर जमाही केली होती. तसेच, तिच्याबरोबर या प्रकरणात अजून एक व्यक्त सहभागी असून त्या दोघांनी आपल्या पतीचा छळ चावला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

No comments: