Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 February, 2011

गृहखात्याचे बिंग फुटले : पर्रीकर

ड्रग्जप्रकरणी सीबीआयच्या पवित्र्याने
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पोलिस - ड्रग माफिया साटेलोटे प्रकरण सीबीआयकडे दिले, असे सांगून गृहखात्याने जनतेची घोर फसवणूक केली होती. मात्र, खुद्द सीबीआयलाच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागल्याने गृहखात्याचे हे बिंग फुटले आहे. एखादे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करावयाचे असल्यास कलम ५ नुसार राज्य सरकारला आधी अधिसूचना काढावी लागते. ती काढल्यानंतरच सीबीआय ते प्रकरण हाताळू शकते. ही अधिसूचना अद्याप काढलीच गेलेली नाही. त्यामुळे सरकारचे ढोंग स्पष्टपणे उघडे पडले आहे. हे सरकार म्हणजेच एक महाघोटाळा असून यात बहुतेकजण गुरफटलेले आहेत, अशी सणसणीत प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.
पोलिस - ड्रग माफिया साटेलोटे प्रकरण सरकारने सीबीआयला दिलेच नसल्याचे न्यायालयात काल उघड झाल्याने त्याबद्दल श्री. पर्रीकर यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते आज सायंकाळी ‘पणजी फर्स्ट’ पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत होते.
दरम्यान, सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिलेले नसले तरी न्यायालय ते देऊ शकते; आणि तसेही न झाल्यास शेवटी जनता जनार्दनच याप्रकरणी काय तो निवाडा देणार, असेही पर्रीकर म्हणाले. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून ते दडून राहत नाही. ते कधी ना कधी बाहेर येणारच. शिवाय रवी नाईक हेही काही कायमच गृहमंत्री असणार नाहीत, असेही सूचक विधान त्यांनी केले. या प्रकरणामुळे गोवा पोलिसांची एवढी बेअब्रू झाली आहे की, त्यामुळे ‘आयपीएस’ अधिकारीही येथे थांबायला तयार नाहीत, असेही ते म्हणाले.
अमलीपदार्थ प्रकरणात एका मंत्र्यांच्या मुलाचा समावेश आहे हे केवळ विरोधी पक्षच म्हणत नाही तर गोव्यातील विविध घटकांनीही त्यांच्यावर आरोप केला आहे. यात रॉय नाईक नसून रॉय फर्नांडिस आहे, असा दवा गृहमंत्र्यांनी विधानसभेत केला होता. तो त्यांचा दावा अजूनही कायम असेल तर हा रॉय नक्की कोण हे बाहेर येणे गरजेचे आहे. रॉय फर्नांडिस की रॉय नाईक तेही लोकांना कळले पाहिजे, असे श्री. पर्रीकर म्हणाले.
-----------------------------------------------------------------
शेवटी जनताच निवाडा देईल
‘‘सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिलेले नसले तरी न्यायालय ते देऊ शकते; आणि तसेही न झाल्यास शेवटी जनता जनार्दनच याप्रकरणी काय तो निवाडा देणार. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून ते दडून राहत नाही. ते कधी ना कधी बाहेर येणारच. शिवाय रवी नाईक हेही काही कायमच गृहमंत्री असणार नाहीत’’

No comments: