Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 February, 2011

सरकारकडून उच्चशिक्षितांची प्रचंड परवड

भाजयुमो अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांची टीका

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
राज्यातील उच्चशिक्षित युवावर्गाला रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे, असा ठपका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी ठेवला. माहिती तंत्रज्ञान व अन्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत उच्चशिक्षण घेऊन रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उच्चशिक्षित बेरोजगारांची प्रचंड परवड सध्या सुरू आहे. या युवकांवर इतर राज्यांत स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवली आहे, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नावे सुरू केलेला व खुद्द सोनिया गांधी यांच्या हस्ते पायाभरणी केलेला दोनापावला येथील ‘आयटी हॅबिटेट’ प्रकल्प राज्यातील कॉंग्रेस सरकारला पूर्ण करणेही शक्य झाले नसल्याने यावरून सरकारची उच्चशिक्षितांप्रति असलेली बेफिकीर वृत्तीच दिसून येते, असा जबर टोला त्यांनी हाणला.
बेकायदा खाण व इतर घोटाळ्यांत व्यस्त असलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारला उच्चशिक्षितांच्या रोजगाराचे काहीही पडून गेलेले नाही व त्यामुळे या वर्गांची प्रचंड परवड सुरू आहे. राज्यात नवीन उद्योग येत नसल्याने रोजगाराच्या वाटा बंद झालेल्या आहेत. या मोठ्या वर्गाला सामावून घेण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही व त्यामुळे या युवकांत प्रचंड असंतोष खदखदतो आहे. दोनापावला येथील राजीव गांधी आयटी हॅबिटेट व सुकुर येथील आयटी पार्क हे दोन्ही प्रकल्प केवळ सरकारच्या निष्क्रियतेमुळेच बंद पडले आहेत. या दोन्ही प्रकल्पांवर आत्तापर्यंत सरकारने सुमारे ३३ कोटी ५८ लाख ७४ हजार ४३१ रुपये गुंतवले आहेत. हा प्रचंड प्रमाणातील जनतेचा पैसा बंद पडलेल्या या प्रकल्पांमुळे वाया जाण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. दोनापावला येथील आयटी हॅबिटेटसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २२ कोटी ७४ लाख १२ हजार ४८६ रुपये खर्च करण्यात आले. ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ताळगावातील स्थानिक लोकांनीच या प्रकल्पाला विरोध करून या प्रकल्पाचे प्रचंड नुकसान केले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान केलेले हे प्रकरण पुरावे नसल्याने पोलिसांनी बंद केले आहे. दरम्यान, हा प्रकल्प रखडण्यास ताळगावातील हिंसक जनता कारणीभूत असल्याचा ठपका सरकारकडून ठेवला जातो. मुळातच या प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी मोर्चा काढलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्याबरोबरच आयटी पार्कची नासधूस करण्यासाठीही पुढाकार घेतलेले नेते आज सरकारात मंत्री म्हणून उजळ माथ्याने वावरत आहेत ही कॉंग्रेससाठी शरमेचीच गोष्ट ठरली आहे.युवकांना मद्याच्या पार्टी आयोजित करून व पैशांचे आमिष दाखवून केवळ मतांसाठी वापर करण्याचेच कॉंग्रेसचे धोरण राहिले आहे.
सुकुर येथील आयटी पार्क प्रकल्पाचे काम घिसाडघाईने करण्यात आल्याने या प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २३ एप्रिल २००७ रोजी स्थगिती दिली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकल्पाच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान महामंडळातर्फे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या १० कोटी ८४ लाख ६१ हजार ९४५ रुपये खर्च करण्यात आला आहे. आयटी पार्कच्या निमित्ताने तत्कालीन मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील इतर कामे उरकून काढली, असा टोलाही यावेळी डॉ. सावंत यांनी हाणला. दरम्यान, हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचेच दिसून येते व त्यामुळे या सरकारने उच्चशिक्षित युवावर्गाला वार्‍यावरच सोडून दिल्याचेही स्पष्ट होते,असेही ते म्हणाले.

तुमचे मत हेच शस्त्र
गोव्याची लूट चालवलेल्या भ्रष्ट कॉंग्रेस आघाडी सरकारला घरी पाठवण्यासाठी आता युवकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. अनेक गैरमार्गातून मिळवलेला काळा पैसा फेकून युवकांना लाचार बनवणार्‍या नेत्यांना योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आपले अमूल्य मत हेच शस्त्र म्हणून वापरावे व या भ्रष्ट सरकारला घरी पाठवावे, असे आवाहन भाजयुमोचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.


शेवटी खापर ताळगाववासीयांवर
ताळगावातील राजीव गांधी आयटी हॅबिटेट प्रकल्पाला विरोध करणारे ताळगावचे आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना सरकारने ‘क्लीन चीट’ दिली आहे. या प्रकल्पाच्या जाळपोळ व नुकसानीस ताळगावातील हिंसक जनता कारणीभूत आहे, असा ठपका ठेवत याचे खापर ताळगाववासीयांवर फोडले आहे. काणकोणचे आमदार विजय पै खोत यांच्या एका तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे.

No comments: