Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 February, 2011

‘आयएएस’, ‘आयपीएस’ अधिकार्‍यांच्या बदल्या

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)ः पुढील महिन्यात होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य प्रशासन अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामात व्यस्त असतानाच आज अचानक सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाल्याने प्रशासकीय कामकाज पुन्हा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या आदेशांत दोन ‘आयएएस’ अधिकारी व दोन ‘आयपीएस’ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत.
यासंबंधी सचिवालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनातील सनदी अधिकार्‍यांच्या खाते बदलाची आजच अधिसूचना जारी करण्यात आली. आज दोन सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याने पुन्हा एकदा खाते बदल करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांचे सचिव तथा माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव नरेंद्र कुमार तसेच कृषी सचिव सी.पी.त्रिपाठी यांची बदली झाली आहे. अशोक आचार्य यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्याने त्यांचेही पद रिकामी झाले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव व विशेष पोलिस अधीक्षक व्ही. व्ही. चौधरी यांचीही बदली झाल्याने आता केवळ पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी हे एकमेव ‘आयपीएस’ अधिकारी पोलिस प्रशासनात राहिले आहेत. पोलिस महानिरीक्षक सुंदरी नंदा या अनेक दिवसांपासून दीर्घ रजेवर गेल्या आहेत.भीमसेन बस्सी हे देखील आपली बदली इतरत्र करून घेण्यासाठी प्रयत्नरत असल्याची खबर मिळाली आहे. दरम्यान, पोलिस खात्यातील अनागोंदी कारभार व त्यात प्रचंड प्रमाणातील राजकीय हस्तक्षेप यामुळे ‘आयपीएस’ अधिकारी कंटाळल्यानेच ते इतरत्र बदली करून जाण्यासाठी धडपडत होते, असेही सूत्रांकडून कळते. अलीकडे पोलिसांविरोधात न्यायालयात तक्रारी होण्याचे प्रकारही वाढीस लागल्याने पोलिस खाते प्रचंड दबावाखाली वावरत आहे.

No comments: