Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 February, 2011

कारापूर अपघातात दोघे ठार

४५हून अधिक प्रवासी जखमी, काही गंभीर
पाळी, दि. १४ (वार्ताहर)
साखळी - डिचोली हमरस्त्यावर विजयनगर - कारापूर येथील हॅपी होम बार अँड रेस्टॉरंटजवळील वळणावर आज (दि. १४) संध्याकाळी ६.३०च्या सुमारास प्रवासी बस व खनिज मालवाहू टिपर ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीत बसचालक दौलतराव इंद्रोजी राणे (५०) व प्रवासी सौ. कल्पना तुळशीदास केरकर (४०, रावण - पर्ये)) जागीच ठार झाले. या अपघातात ४५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून यातील काही प्रवासी गंभीर असल्याचे समजते. आठ प्रवाशांना बांबोळी येथे हालवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तानुसार, वाळपई - ठाणे ते पणजी प्रवासी वाहतूक करणारी बस क्र. जीए ०१ यू २६०३ पणजीहून वाळपईला जात होती तर आमोणा ते डिचोली खनिज मालवाहतूक करणारा टिपर ट्रक क्र. जीए ०४ टी १७६९ डिचोलीच्या दिशेने जात होता. कारापूर - विजयनगर येथील हॅपी होम बार अँड रेस्टॉरंटजवळ असलेल्या वळणावर बस चालकाचा ताबा सुटला व बस हेलकावे खाऊ लागली. यातच समोरून येणार्‍या ट्रकाला तिने जोरदार धडक दिली. यात सदर बस रस्त्यावर एका बाजूला उलटली. सदर बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन त्यात चालकाचा तात्काळ मृत्यू झाला. बस एका बाजूला कलंडल्याने वाहकाचा हात बसखाली अडकून पडला. तिथे उपस्थित असलेल्यांनी बस उचलून त्याची सुटका केली. याच बसमधून प्रवास करणार्‍या कल्पना तुळशीदास केरकर यांच्या डोक्याला जबर मार लागला. साखळी आरोग्यकेंद्रात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत कल्पना केरकर या डिचोली येथे विक्रीकर कार्यालयात काम करत होत्या. कामावरून सुटल्यानंतर त्या घरी जात होत्या.
दरम्यान, या अपघातात अनेकांना जखमा झाल्या होत्या. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने तात्काळ साखळी व डिचोली आरोग्यकेंद्रांत उपचारास्तव दाखल करण्यात आले. तेथे डॉ. निशात हळर्णकर यांनी आपल्या सहकार्‍यांच्या साह्याने जखमींवर त्वरित उपचार सुरू केले. प्रवाशांपैकी आठ जणांच्या जखमा गंभीर असल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हालवण्यात आले. यात सूर्या पुजारी (३२, होंडा), कृष्णा पर्येकर (वाळपई), कु. खांडेकर (२४, गृहनिर्माण वसाहत हरवळे), अर्चना बाराजणकर (२८, हरवळे), रघू नाडकर्णी (२९, विठ्ठलापूर-साखळी), निर्मला पर्येकर (२४, धाटवाडा-वाळपई), ज्योती सदानंद पांगम (५५, मोर्ले) आणि उषा च्यारी (४०, होंडा) यांचा समावेश आहे. इतरांवर साखळी आरोग्यकेंद्रात उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
डॉक्टरांची तत्परता
साखळी आरोग्यकेंद्रात ड्युटीवर असलेल्या डॉ. निशात हळर्णकर यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेचच ऑफ ड्युटी असलेल्या डॉ. दीपचंद गावडे व डॉ. दिगंबर नाईक यांना आरोग्यकेंद्रात बोलावून घेतले. दोन्ही डॉक्टरांनी त्वरित आरोग्यकेंद्रात धाव घेऊन जखमींवर उपचार केले. त्यांना या कामात प्रविणा राणे, मानसी हिंदे या परिचारिकांनी व श्री. रमेश यांनी साह्य केले.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस, भाजयुमो अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, साखळीच्या माजी नगराध्यक्ष सौ. सुनिता वेरेकर, नगरसेवक व अन्य नागरिकांनी आरोग्यकेंद्रात धाव घेतली. डिचोली पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर, उपनिरीक्षक तुकाराम वाळके, साहाय्यक निरीक्षक सी. गावकर यांनीही घटनास्थळी व आरोग्यकेंद्रात धाव घेतली.

No comments: