Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 10 July, 2010

नक्षली व्हायला भाग पाडू नका

'मोप' अन्यायग्रस्तांचा सरकारलाइशारा
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): अनंत काळापासून आमच्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून कसलेल्या आमच्या सुपीक जमिनी हेच आमच्या जगण्याचे साधन आहे आणि सरकारने दबाव आणून व अन्याय करून आमच्या पूर्वापार जमिनी आमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास
नक्षली बनून आमच्या भूमातेचे रक्षण करण्याचा विचार करावा लागेल. सरकारने आमच्यावर अन्याय करून आम्हाला नक्षली बनण्यास भाग पाडू नये, असा कडक इशारा मोपा विमानतळ पीडित शेतकरी समितीचे सचिव संदीप कांबळी यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
मोप-तांबोशे, उगवे, पोरस्कडे, वारखंड, हसापूर व चांदेल या पेडणे तालुक्यातील सहा पंचायत क्षेत्राच्या कार्यकक्षेत होणाऱ्या मोपा विमानतळामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत अशा
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी गोमंतक साहित्य सेवक संघाच्या कार्यालयात पत्रपरिषद आयोजिली होती. त्यात श्री. कांबळी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जी.एफ.ई.चे अध्यक्ष दिलीप हेगडे, दिगंबर तुळसकर व नागरिक हजर होते.
श्री. कांबळी म्हणाले, जे लोक मोपा विमानतळासाठी आपल्या सुपीक जमिनी देत नाहीत त्यांच्यावर भूसंपादन अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे. त्यांच्या नावाच्या नोटिसा व धनादेश शेजाऱ्यांना देणे, भलत्याच व्यक्तीच्या नावे धनादेश काढण्याचे प्रकार होत आहेत. चुपचाप मान्यता घ्या न पेक्षा जबरदस्तीने जमिनी काढून घेऊ, तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. ज्या लोकांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनासुद्धा नोटिसा काढून भूसंपादन अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे.
आम्ही केंद्र सरकारकडे कैफियत मांडली असता केंद्राने मुख्यमंत्र्यांना याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. मात्र मुख्यमंत्री क्रीडामंत्र्यांच्या दबावामुळे गप्प आहेत. आमच्या सुपीक जमिनी स्वस्तात (रु. ६ ते १२ प्रति चौ. मी.) घेऊन बिल्डर व जमीन माफियांना विकण्याचे काम सत्ताधारी करत असून विमानतळ झाल्यास पेडणेवासीयांना पेडणे सोडावे लागेल. भूमिपुत्रांच्या जागी बिगरगोमंतकीयांचे तांडे येथे येतील व पेडण्याची अवस्था वास्कोसारखी होईल, असेही ते म्हणाले.
गोवा शेतकी समितीचे अध्यक्ष दिलीप हेगडे यांनी छोट्याशा गोव्यात जागेची कमतरता असताना दोन विमानतळाची गरजच काय, असा प्रश्न केला. दाबोळीचा विस्तार होणार म्हणताना सुपीक जमिनीवर मोपा कशासाठी, असे ते म्हणाले.
पेडणे तालुक्याला पर्यावरणाची देणगी लाभली आहे. मोपामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. सत्ता आहे म्हणून अन्याय करू नका; नपेक्षा महागात पडेल असे सांगून आमच्या लढ्याला तमाम गोवेकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

No comments: