Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 July, 2010

सरकारला जनतेची नव्हे, तेल कंपन्यांचीच काळजी

गडकरी यांची घणाघाती टीका

मुंबई, दि. ४ - केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला सामान्य नागरिकांपेक्षा तेल कंपन्यांचीच अधिक काळजी असल्याचे दिसते. पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सरकारने केलेल्या जबरवाढीचा निषेध करण्यासाठी सोमवारी (५ जुलै) पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे संपूर्ण देशातील 'आम' जनतेला केले.
राष्ट्रीय राजधानीत आयोजित एका पत्रपरिषदेत गडकरी यांनी पाच जुलैचा बंद यशस्वी होईलच, असा विश्चास व्यक्त करताना वाढत्या महागाईसाठी केंद्रातील संपुआ सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासह केंद्रातील मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. सरकारचे प्राधान्य तेल कंपन्यांना आहे, की सामान्य जनतेला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कॉंग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले, की केंद्रातील सरकारने शंभर दिवसांत महागाईवर नियंत्रण मिळविण्याची भाषा केली होती; मात्र महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. चलन वाढीचा दर १३ टक्के असताना पेट्रोलचे दर वाढविणे सर्वथा चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. पेट्रोलच्या वाढलेल्या दराचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या समर्थनासाठी त्यांच्यावर टीका करताना गडकरी म्हणाले, की देशात जवळपास ५० टक्के लोक दारिद्र्‌यरेषेखालील असताना अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांना केवळ तेल कंपन्यांचीच विपन्नावस्था दिसते; मात्र गरीब जनतेचे हाल त्यांना दिसत नाहीत. गव्हाचे अतिरिक्त उत्पादन होत असतानाही देशातील गव्हाच्या किमती वाढत आहेत, असाही आरोप यावेळी गडकरींनी केला.

No comments: