Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 July, 2010

देशभरात अभूतपूर्व 'बंद'

शंभर टक्के 'बंद'ने गोवाही ठप्प
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील "एनडीए'च्या घटकांनी घोेषित केलेल्या आजच्या बंदला देशातील कानाकोपऱ्यांबरोबरच गोव्यातही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गोव्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी बंद म्हणून आजच्या या बंदचा उल्लेख करावा लागेल. पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी ठरलेल्या या बंदच्या वेळी सोमवारी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, बाजार, शहरे, व्यापारी आस्थापने, खाजगी आस्थापने इतकेच नव्हे तर बॅंका, पेट्रोलपंप, खाजगी प्रवासी बसवाहतूक, उपाहारगृहे, रिक्षा, टॅक्सी, मोटारसायकल पायलट, मासळी मार्केट, भाजी मार्केट असे सर्वच व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे आजच्या बंदात नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, छोटे व्यापारी, व्यावसायिक असे सगळेच उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यभरातील संपूर्ण व्यवहार आज कधी नव्हे इतके ठप्प झाले. राज्याच्या दैनंदिन जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम दिसून आला.
बंदच्या काळात कोणतीही मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नसली तरी काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक होण्याचे तसेच रास्ता रोको करण्याचे एक दोन तुरळक प्रकार घडले आहेत. बंदच्या काळात संपूर्ण राज्यभरात एकूण दहा व्यक्तींना अटक झाल्याचीही नोंद आहे. या बंदमध्ये भाजपबरोबर शिवसेना, डावे पक्ष, कामगार संघटना तसेच रापणकार संघटना आदी सहभागी झाले होते.
आजचा दिवस उजाडला तोच बंदचा ताण घेऊनच. बंदमध्ये सहभागी होण्याचा नागरिकांनी आधीच निर्णय घेतला होता त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. इंधन दरवाढीचा फटका सामान्यांना अधिक बसला असल्याने त्यांनी बंदचे स्वागतच केले होते. त्यातच खाजगी बसमालकांनी तिकीट दरवाढीच्या मागणीसंदर्भात जाहीर केलेला बंद आणि एनडीए घटकांनी घोषित केलेला हा बंद असा हा योगायोग त्यामुळे चांगलाच जुळून आला. खाजगी बसमालकांनी आज संपावर जाऊ नये यासाठी वाहतूक खात्याने बसमालकांची २० पैसे प्रती किलोमीटर दर वाढीची मागणी १० पैशांवर आणून हा विषय मोकळा करण्याचा प्रयत्नही केला होता. तथापि बसमालक मात्र २० पैशांच्या मागणीवर ठाम राहिले. बस मालकांनी आजच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये यासाठी एस्मा कायदा लावण्याबरोबरच काही बसमालकांचे हंगामी परवाने रद्द करण्याची धमकीही सरकारकडून देण्यात आली होती परंतु ही मंडळी बधली नाही. या उलट परवाने रद्द करून दाखवाच असे उलट खणखणीत आव्हान त्यांनी सरकारला दिले. परिणामी खाजगी बसमालकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर आणल्या नाही तरी प्रवासी वाहतूक चालू राहावी या उद्देशाने कदंब महामंडळाने जवळपास ७० अतिरिक्त बसगाड्या रस्त्यावर उतरवण्याची तयारी ठेवली होती. वाहतूक खात्याने तशी जोरदार तयारीही केली होती. परंतु राज्यात शेकडो खाजगी बसगाड्या रस्त्यावर उतरल्याच नसल्याने आधीच निर्णय घेऊन टाकलेल्या नोकरदारांनी, शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व विविध कामांसाठी शहरांकडे येणाऱ्यांनी चक्क सुट्टीच घेतली. अनेकांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आदीच सुट्टी घेऊन टाकली होती. याचा परिणाम म्हणून बंदचे परिणाम भल्या सकाळीच दिसू लागले.
पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा, डिचोली, कुडचडे, काणकोण, कुंकळ्ळी, पेडणे, वाळपई असा अनेक ठिकाणी बसस्थानके सकाळीच ओस पडली. विविध मार्गांवर सुटण्यासाठी उभ्या असलेल्या अवघ्याच कदंब बसगाड्या परंतु त्या भरण्यास प्रवासीच नाही. बसस्थानकांवर पोलिसांचा, आरटीओंचा फौजफाटा परंतु प्रवाशांचा पत्ताच नाही अशा अवस्थेमुळे बंद मोडून काढण्यासाठी हत्यारे परजून असलेल्या पोलिस यंत्रणेला केवळ हात चोळत बसण्यापलीकडे काहीच उद्योग राहिला नाही. विविध मार्गांवरील कदंबच्या गाड्या पोलिस संरक्षणात पाठवण्याची तयारी करण्यात आली होती परंतु बसमध्ये प्रवाशांऐवजी पोलिसच अधिक अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. आजच्या बंदला सकाळी सकाळी मिळालेले हे अशा प्रकारचे यश होते.
पणजीसहित काही शहरांमध्ये अत्यल्प विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतीत शाळा सुरू झाल्या खऱ्या परंतु शहरातील शंभर टक्के बंदच्या पार्श्वभूमीवर त्या अधिक वेळ चालू ठेवणे शाळा चालकांना शक्य झाले नाही. साडे नऊ होईपर्यंत यातील सगळ्याच शाळांना सुट्टी देण्यात आली. पणजी शहरातील सगळ्याच शाळा सकाळी सोडण्यात आल्या. बंदचा परिणाम शहरात त्यामुळे अधिक जाणवला. इतर शहरांमध्येही तीच परिस्थिती होती. व्यापारी आस्थापने, मासळी मार्केट, विविध कार्यालये, दुकाने उघडली गेलीच नाही. व्यापाऱ्यांनी तर स्वतः होऊनच या बंदला पाठिंबा दिला होता. भाजी, मासळी तसेच इतर मार्केटात अगदी शुकशुकाट होता. पणजी मार्केटात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला होता. सगळ्याच घटकांचा त्यात समावेश होता. पणजी शहरातील एकूणएक दुकाने आणि आस्थापने व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन बंद ठेवली होती. शहरात भाजपचे काही कार्यकर्ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरताना दिसत होते. खुद्द विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर सुध्दा आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी घोळक्यात चर्चा करताना दिसत होते. शंभर टक्के बंदबद्दल त्यांनी सर्वांनाच धन्यवाद दिले. केवळ पणजीतच नव्हे तर सांतिनेज, ताळगाव, सांताक्रूझ अशा उपभागांमधील बाजार आणि दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. असा बंद यापूर्वी पणजी व गोवेकरांनी कधीही पाहिला किंवा अनुभवला नव्हता अशी चर्चा दरम्यानच्या काळात नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे आपल्या समर्थकांसह परिस्थितीवर नजर ठेवून होते. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी नव्या पाटो पुलानजीक रस्ता अडवला व महागाईविरोधात जोरजोरांनी घोषणा दिल्या. काही वेळात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा रस्ता खुला करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात बंदला जबरदस्त पाठिंबा मिळाला. मडगाववासीयांनी या बंदात सहभागी होऊन महागाईबद्दलची आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. वाळपईतील लोकांनीही या बंदात पूर्ण सहकार्य केले व महागाईसमोर कुणीही "बाबा' श्रेष्ठ नसल्याचेच अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिले. दुपारी वाळपईचे पोलिस निरीक्षक पोलिस फौजफाट्यासह जबरदस्तीने काही व्यापाऱ्यांना दुकाने खोलण्याचे आवाहन करताना दिसत होते. येथील व्यापाऱ्यांनी मात्र हा डाव हाणून पाडला व कोणत्याही परिस्थितीत दुकाने न उघडण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांची नाचक्कीच झाली. या भागातील एका राजकीय नेत्याच्या आदेशावरूनच पोलिसांनी हा प्रयत्न केला होता, अशीही खबर मिळाली आहे. खुद्द गृहमंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघातही बंदाला चांगला प्रतिसाद मिळाला.

No comments: