Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 7 July, 2010

बालवाडीचे भाग्य कधी उजाडणार?

फोंडा तालुक्यात उसगाव गावात गुळेली आणि उसगाव (वडाकडे) यांच्यामध्ये नाणूस या वाड्यावर सरकारने साधारण १९८६ साली बालवाडी सुरू केली. त्यावेळी सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरीही त्याच्या कारभाराला त्यावेळी माया व प्रेमाची किनार होती. त्या काळातील सरकारला हवी असायची ती माणसे, मते नव्हेत. म्हणून लोकांच्या मागणीनुसार तेव्हा ही बालवाडी सुरू झाली. त्यावेळी ती बालवाडी एका घरात भाड्याने एक खोली घेऊन चालवत असत. नंतर सरकारी सेंटर आणि बालवाडी एकेच ठिकाणी चालवायला घेतली.
साधारण दोन-चार वर्षापूर्वी सेंटर एकीकडे तर बालवाडी दुसरीकडे गेली आहे, एवढे खरे. इथे जी मुलांची खोली आहे, त्या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अगदी राहवत नाही. बाई तरी बिचाऱ्या काय करणार? तसे पाहिले तर या नाणूस वाड्यावर सगळे काही आहेही आणि काहीही नाही, अशीच परिस्थिती आहे. कारण जेथे सेंटर आहे तिकडे घाण, केरकचरा साचलेला असतो. पावसाळ्यात तर तिथे डबकीच साचतात. कदाचित आरोग्य खात्याला आणि सरकारला हे माहीतही नसावे. नाही तर त्यांनी या परिस्थितीत थोडी तरी सुधारणा केली असती. आयुर्वेदात आपल्याला सांगितले आहे की, आपण जेवढी स्वच्छता राखाल तेवढेच रोग आपल्यापासून दूर जातील.
दोन वर्षांपूर्वी या बालवाडीची नवी इमारत उभी राहिली खरी, मात्र या बालवाडीला अद्याप मूर्त स्वरूप आलेले नाही. बालवाडीत साधारण ३० ते ३५ मुले असणार. एका सज्जन माणसाने बालवाडीकरिता जागा देऊन सुसज्ज अशी इमारत बांधली, रंगरंगोटी केली. संडासाचे बांधकाम करून विजेचीही सोय केली. मात्र हे सर्व असूनही ही इमारत बिचारी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तिला अद्याप कोणीही वाली भेटलेला नाही. सरकार याकडे कधी डोळे उघडून पाहणार आहे काय? सुसज्ज असलेल्या या इमारतीला दोन वर्षे उलटून गेली तरी तिचे उद्घाटन का नाही होत? यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो आहे. उसगाव हा गाव दोन मंत्र्यांच्या मतदारसंघांच्या मधोमध येतो. एका बाजूने गृहमंत्री तर दुसऱ्या बाजूने आरोग्यमंत्री. या दोघांमध्ये एकमत होत नसल्याने तर हे उद्घाटन अडले नसेल ना? या दोन मंत्र्यांच्या मध्ये बिचारे बालवाडीचे विद्यार्थी तर पडले नसतील ना? "उसा'ने भरलेला गाव आहे म्हणून तरी एक वेळ नजर टाका. १९८६ ते २०१०, म्हणजेच आजपर्यंत २४ वर्षे झाली. तरीही अजून येथील बालवाडी भाड्याच्याच घरात भरते आहे. आणि हे सरकार दररोज शंख करतेच आहे की, आजचे विद्यार्थी हे भारताचे उद्याचे आधारस्तंभ आहेत!
तेव्हा आता एवढेच सांगावयाचे आहे की, सरकारने लवकरात लवकर या बालवाडीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करून वाड्यावरील लोकांचा दुवा घ्यावा.
- सौ. सुरेखा देसाई
उसगाव - फोंडा-गोवा.
नाणूसवाडा.

No comments: