Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 July, 2010

इंधन दरवाढ केलेल्या कॉंग्रेसचा नक्षा उतरवण्यासाठी 'बंद'मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा

खासदार श्रीपाद नाईक यांचे जाहीर आवाहन
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्ष हा साठेबाज व काळाबाजारवाल्यांचा "डॉन' आहे. अमर्याद भ्रष्टाचार व प्रत्येक व्यवहारात "कमिशन'बाजी करूनच कॉंग्रेस नेत्यांनी संपत्ती जमा करताना सामान्य जनतेला मात्र भिकारी बनवले. नोटांच्या बळावर मस्तवाल झालेल्या कॉंग्रेसला जनतेच्या पोटाची कळ अजिबात समजणार नाही.
ही कळ दिल्लीतील कॉंग्रेस सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीच ५ जुलै रोजी पुकारलेल्या "गोवा बंद' आंदोलनात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी केले.
आज इथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश पदाधिकारी उल्हास अस्नोडकर व नरहरी हळदणकर तसेच सत्तरीचे कार्यकर्ते राजेश गावकर हजर होते.
देशात महागाईचा आगडोंब उसळत असताना पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती वाढवून केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत सरकार जनतेच्या उपाशी पोटावर लाथ मारण्याचेच पाप करीत असल्याचा आरोप श्रीपाद नाईक यांनी केला. जगातील एक नामवंत अर्थतज्ज्ञ अशी ख्याती असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग महागाई आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरले. शंभर दिवसांत महागाई कमी करू ही अखेरपर्यंत वल्गनाच ठरली व आता महागाईचा चढता आलेख पाहता कॉंग्रेसने देशवासीयांना देशोधडीलाच लावण्याचा चंग बांधला आहे असे वाटण्याजोगी दारुण स्थिती निर्माण झाली आहे, असेही नाईक म्हणाले.
देशव्यापी बंदाला पाठिंबा देण्यासाठी "गोवा बंद'च्या आवाहनाला सर्वथरांतून पाठिंबा मिळत आहे. शिवसेना, भाकप, कामगार संघटना, खाजगी बस मालक आदींनी या बंदात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. सामान्य जनतेचे भवितव्य उज्वल व्हावे या उद्देशानेच हा बंद आयोजित करण्यात आला आहे. या बंदवेळी आपत्कालीन सेवेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता लोकांनी घ्यावी. तसेच रुग्णालये, रुग्णवाहिका, लग्नाचे वऱ्हाड आदींना मोकळीक मिळेल याचीही काळजी घ्यावी अशी विनंतीही नाईक यांनी केली. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सोमवारी ठेवलेल्या मुलाखती मंगळवारी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. फक्त एक दिवस कळ सोसून दिल्लीतील आणि स्थानिक सरकारलाही आपले बळ दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुती यांनी विश्वासघात केला
भाजपची सदस्यता नोंदणी दर तीन वर्षांनी होत असते व त्यामुळे आपण भाजपचे सदस्यच नव्हतो,या पुती गावकर यांच्या दाव्यात काहीच दम नाही अशी प्रतिक्रिया खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली. भाजपची उमेदवारी बहाल करून पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला; पण त्यांनी पक्षाचा विश्वासघातच केला आणि ते कॉंग्रेसवासी झाले. विश्वजित यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करून समझोता कुणी केला, असा सवालही त्यांनी यावेळी केला. भाजपने बहुजन समाजाचा केवळ वापर केला, या आरोपांत काहीच तथ्य नसून वाळपईचे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले नरहरी हळदणकर हे बहुजन समाजाचेच घटक होते. राजकारण हा धंदा असे समजणाऱ्यांना काय सांगावे, असा खोचक प्रश्न श्रीपाद नाईक यांनी केला. पर्ये मतदारसंघाप्रमाणे वाळपई मतदारसंघावरही एकाधिकारशाही गाजवू पाहणाऱ्यांना आगामी पोटनिवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असेही नाईक म्हणाले.

No comments: