Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 July, 2010

..तर गोवा स्वर्गाहूनही सुंदर होईल!

नासीर अ. दिवेकर
आकें - मडगाव


कामानिमित्त महाराष्ट्रातून माझे गोव्यात येणे झाले. महान महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातील लोकही शांत व प्रेमळ आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा राज्य देखील एक स्वर्गच आहे. आज जगातील एक अप्रतिम पर्यटन स्थळ म्हणून गोवा राज्याची सर्वत्र कीर्ती पसरली आहे. जगभरातील लोक फिरण्यासाठी गोव्यात येतात. त्यामुळे राज्याची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे. राज्याचा आर्थिक कणा पर्यटनावरच अवलंबून आहे. या पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळावी म्हणून राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवीत असते. परंतु, हे करत असताना संबंधितांनी खालील गोष्टींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते.
मडगावचाच विचार करावयाचा झाल्यास, मडगाव मार्केट फिरून झाल्यावर किंवा अन्य कोठूनही पांडव कपेलकडून रेल्वे पकडण्यासाठी किंवा रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी येथे फार मोठा वळसा घालून मुख्य गेटकडे दुसऱ्या बाजूला जावे लागते. त्यामुळे पर्यटकांना, विशेषतः मुलांना, महिलांना व वृद्धांना फार त्रास होतो. कारण पूल चढून उतरावा लागतो. पूल उतरल्यावर लगेच दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था आहे. त्यामुळे आणखीनच त्रास वाढतो व कधीकधी त्यामुळे गाडी देखील चुकते. तरी मागील गेटवर जर तिकीट काढण्याची व गाडी पकडण्याची सोय झाली तर ते सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे.
पर्यटनासाठी येथे असलेली दुसरी मोठी समस्या कचरा कुंड्या, बेवारस कुत्री व होणारे अपघात! रस्त्यावरून चालणारे तर सोडाच परंतु, दुचाकीवरून किंवा चारचाकीने भरधाव वेगाने जाणारेही वाहनाची गती अजिबात कमी न करता गाडीतूनच कचरा कुंडीत फेकतात. बऱ्याचदा हा कचरा कुंडीत न पडता आजूबाजूला फेकला जातो. तसे झाल्याने इथे मोकाट फिरणाऱ्या बेवारस कुत्र्यांची चांगलीच चंगळ होते. सदर कचऱ्याच्या पिशव्या ओढून, फाडून हे कुत्रे सर्व कचरा रस्त्यावर पसरतात. त्यामुळे येथील बऱ्याच भागांत असह्य दुर्गंधी तर पसरतेच शिवाय रोगराईही पसरण्याची भीती असते. या दुर्गंधीमुळे व गलिच्छतेमुळे पर्यटकांची गोव्याविषयीचे मत दूषित होते व त्यामुळे त्यांची संख्याही रोडावते. सभ्य लोकांनी मनावर घेतले तर या समस्येचे त्वरित निराकरण होणे कठीण आहे का?
भटक्या कुत्र्यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. ही कुत्री म्हणजे वाटसरूंसाठी मोठा धोका ठरतो आहे. विशेषतः रात्री ८ वाजल्यानंतर रस्त्यावर चालावे म्हटले तरी जीव मुठीत धरून चालावे लागते. कारण नाक्यानाक्यावर जेथे कचरा पेटी आहे तेथे १५- २० कुत्री असतातच असतात; अन्य ठिकाणीही असतात. ती भुंकून अंगावर येतात व वाहनांच्या मागे धावतात, त्यामुळे अपघात झाल्याचेही वेळोवेळी दृष्टीस पडते. संबंधितांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवले तर लोकांना होणारा उपद्रव टाळता येऊ शकेल.
जाता जाता उल्लेख करावयाचा आहे तो हल्ली या शांत व स्वर्गीय स्थळी घडणाऱ्या काही अप्रिय घटनांचा! अशा घटनांचे प्रमाण गोव्यात अलीकडे विलक्षण वाढलेले आहे. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे अशा गोष्टींचा गाजावाजाही त्याच प्रमाणात होतो. त्यामुळे या राज्याची सुंदर, सहनशील, आदरातिथ्यात अग्रेसर अशी जी जागतिक प्रतिमा आहे ती खराब होते. त्यामुळे अशा अप्रिय गोष्टी या शांत व नयनरम्य राज्यात घडू नयेत म्हणूनही संबंधितांनी कंबर कसण्याची आवश्यकता आहे. हे स्थळ म्हणजे स्वर्गच आहे; परंतु, आपण मनावर घेतले तर ते स्वर्गाहूनही सुंदर होऊ शकेल. तसेच होवो अशी प्रार्थना करूया व राज्याबरोबरच देशाचेही नावही उज्ज्वल करूया.

No comments: