भाजपाध्यक्षाचे आवाहन
इंदूर, दि. १८ (प्रतिनिधी): राम मंदिर हा भाजपचा आत्मा आहे. त्यापासून आम्ही ढळलेलो नाही. सर्वांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याची आमची भूमिका आहे. अल्पसंख्य समुदायाला माझी विनंती आहे की, त्यांनी राममंदिराची जी जागा आहे, ती मंदिराच्या निर्माणासाठी द्यावी. आम्ही मशिदीसाठी पर्यायी जागा देऊ, एवढेच नव्हे तर मशीद बांधूनही देऊ, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले.
आतापावेतो भारतातील ग्रामीण व्यवस्थेची विकासाची आणि कृषीची जी पध्दतशीर दुर्दशा कॉंग्रेस पक्षाने केली आहे, ती संपविण्यासाठी महात्मा गांधी आणि पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना अभिप्रेत असलेला ग्रामोदय उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी गाव चलो चा मंत्र अमलात आणवला पाहिजे, असे भावपूर्ण आवाहन नितीन गडकरी यांनी आज केले. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षपदाची औपचारिक सूत्रे हाती घेतल्यानंतर ते कुशाभाऊ टाकरे परिसरातील राजमाता सिंधिया सभागृहात पाच हजारावर अधिक प्रतिनिधींना संबोधित करीत होते.
ग्रामीण भागातील खरी क्षमता कॉंग्रेसला कधी कळलीच नाही, त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने सरकारी धोरणांची फेरआखणी करणे जरूरी झाले आहे. शेतीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायलापाहिजे. तसेच, ग्रामीण भागातील उद्योजक उभे होऊन मूल्यवर्धित कृषी प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. शहरी भाग आणि ग्रामीण भाग यातील विद्युत पुरवठ्याबाबत जो भेदभाव केला जातो, तो संपुष्टात आला पाहिजे, असेही त्यांनी विद्यामान संपुआ सरकारला ठणकावून सांगितले.
आपल्या तपशीलवार भाषणात त्यांनी जवळजवळ ६५ मुद्यांना स्पर्श करून भाजपची प्रतिमा उजळून निघावी यासाठी विविध मुद्दे विचारार्थ समोर ठेवले. केंद्र शासनाने ७३ वी आणि ७४ वी जी घटना दुरुस्ती केली आहे, त्यातून पंचायतराज संस्थांना खरा प्राण मिळालेला नाही, असे सांगून ते म्हणाले, केंद्रीय कर महसुलाचा किमान दहा टक्के भाग हा सरळ ग्रामपंचायती आणि महापालिका यांना देण्यात आला पाहिजे. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनाही लोकशाहीवादी मार्गाने त्यांना समाविष्ट करत अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. मी आपल्यासमोर ग्रामीण अर्थ०यवस्थेच्या प्रगतीची क्षमता असलयाचे कुठलेही पुस्तकी ज्ञान पाजळत नाही. तर मी प्रत्यक्ष अनुभवातून या बाबी शिकलो आहे. ग्रामीण भागातील पर्यटन, वन्य भागातील पर्यटन याला जर अग्रक्रमाने चांगले रस्ते पुरविले, चांगली हॉटेलं उभारलीत तर निश्चितपणे या क्षेत्रालाही चांगले दिवस येऊ शकतात.
भारताच्या विकासाचे पर्यायी मॉडेल हे गाव चलोच असले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, चांगले रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जागतिक दर्जाची टेलिफोन यंत्रणा व आयटीच्या सर्व सोईसुविधा या भागात असल्या पाहिजेत. सतत वीज पुरवठा व्हावा, अनेक प्रीकुलिंग प्लाण्टस उभारले जावेत आणि यातूनच भारताचे आधुनिक खेडी उभी राहतील आणि शहरी भागातील माणसांनाही ग्रामीण भागाकडे जावेसे वाटू लागेल, असे वातावरण निर्माण होऊ शकते.
२१ व्या शतकाकडे जाण्याची ही भाजपाची नवीन दृष्टी कार्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे. आपल्या भाषणाच्या प्रारंभी कार्यकर्ताधिष्ठित पक्ष म्हणून कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले. १९८० साली मुंबईला भाजपाची स्थापना झाली, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून मी जेवढा उत्साह अनुभवला होता, तेवढाच उत्साह मला आजही कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. एका सामान्य कार्यकर्त्यावर अध्यक्षपदाची जबाबदार आली आहे, याने माझा अभिमानाने उर भरून येतो. मी अध्यक्ष होणे हा कार्यकर्त्यांचाच एक सन्मान आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय तसेच, अटलबिहारी वाजपेयी , लाकृष्ण अडवाणीआणि राजनाथसिंग यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी अटलजींच्या प्रकृतीसाठी सर्वासह ईश्वराची प्रार्थना केली.
राष्ट्र पहिले, पक्ष नंतर आणि व्यक्ती सर्वात शेवटी असाआपला क्रम असला पाहिजे, असे आवर्जुन सांगत ते म्हणाले, आम्ही सगळ्यानी प्रयत्न केला तर जो तात्पुरता माघारीचा भाव आम्हाला अनुभवायला मिळाला होता, तो संपून जाऊ शकतो. हे करत असतानाच त्यांनी भाजपाच्या कार्यविस्ताराचा विस्ताराने आढावा घेतला.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आणि प्रश्नांचा तपशीलवार आढावा घेऊन त्यांनी कॉंग्रेस पक्षाला असेआवाहन केले की प्रत्येक महत्वाच्या विषयावर समान राष्ट्रीय भूमिका आपण स्वीकारली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन करून ते म्हणाले, आतापर्यंत ज्या ज्या वेळी असा राष्ट्रीय महत्वाचा विषय आला, त्यावेळी कॉंग्रेसने ना कधी चर्चा केली ना विरोधकांचे सहकार्य मागितले. अमेरिकेशी अणुशक्तीविषयक करार करताना किंवा कोपनहेगन परिषदेच्या वेळी आपण एकच राष्ट्रीय भूमिका घेऊ शकलो नाही. ही स्थिती टाळली पाहिजे.
जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न हा आमच्यासाठी त्यागाचा आणि समर्पणाचे प्रतीक आहे असे ठासून सांगत गडकरी म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेच्या खऱ्या भावनेसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपले बलिदान केले आहे. मात्र, जम्मू काश्मीरच्या विषयात संपुआ सरकार चुकीच्या दिशेने जात आहे आणि त्याचे संपूर्ण देशावर धोकादायक परिणाम होऊ शकतात. जम्मू आणि काश्मीर तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे या भारताच्या भूमिकेपासून आम्ही ढळावे म्हणून बाह्य दबावही येत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांच्या संयुक्त सरकारने पाक विघटनवाद्यांना पत्करून घेण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. जर कॉंग्रेसने असेच बोटचेपे धोरण घेतले तर १९४७ साली आम्ही जी चूक केली त्यासारखी भयानक आणि देश विघटनकारी घटना होईल अशी मला भीती आहे. फुटीरवाद्यांना आम्ही अशा पद्धतीने काश्मिरात समाविष्ट करून घेणार नाही आणि काश्मीर हा भारताचाच भाग राहील यासाठी आम्ही आमच्या प्राणांची आहुती द्यायलाही सज्ज आहोत.
कॉंग्रेस पक्षाने मतपेटीचे जे राजकारण अधिक गतिमान केले आहे, त्यामुळे भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे, असा गंभीर इशारा देऊन गडकरी म्हणाले, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा या बाबीकडे राजकीय हितसंबंधाच्या दृष्टीने न बघता राष्ट्रीय दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. ज्यावेळी रालोआचे सरकार होते, त्यावेळी आम्ही हा दृष्टिकोन बाळगला होता. आपल्या देशाच्या भोवती सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते बघता आपली शस्त्रसज्जता कुठल्याही परिस्थिीतीत अजिबात कमी होऊ नये ही बाबही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित करून सांगितली. आज जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद या दोनचा मोठा धोका आपल्या अंतर्गत सुरक्षेला आहे असे सांगून पुण्यात नुकत्याच झलेल्या जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटाचा त्यांनी उल्लेख केला. काही कॉंग्रेस नेत्यांनी त्याला राजकीय तीर्थयात्रेचे रूप दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी २६ ११ ला आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्याही पावन स्मृतीचा अपमान केला जात आहे. आणि त्याचवेळेला आपले राजनयिक प्रतिनिधी मात्र पाकशी चर्चा करायला उतावीळ झाले आहेत. पाकिस्तान आज आंतरराष्टीय जिहादी आतंकवादाचा मुख्यालय म्हणून विकसित होत आहे. कुठलंही वैचारिक सुसंगती नाही, विचारांची स्पष्टता नाही आणि ठामपणाही नाही असे गोंधळाचे चित्रआहे. पुण्यातील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तर असे स्पष्ट मत आहे की, दहशतवाद आणि पाकशी चर्चा या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालू शकत नाहीत. पाकिस्तानबाबत आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात भारताने रालोआ सरकारच्या काळात जे धोरण स्वीकारले होते, तेदेखील या कॉंग्रेस सरकारने सोडून दिले आहे. असे सांगून आपल्या अल्पकालीन मताच्या फायद्यासाठी कॉंग्रेस पक्ष आतंकवादाचा धोकाही आता विसरू लागलेला दिसत आहे. कॉंग्रेसचे काही ज्येष्ठ नेते आता जाहीरपणे असे म्हणू लागले आहेत की ज्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकारी मारला गेला आहे, अशी बाटला हाऊसची चकमक ही बनावट आहे. तर दुसरीकडे अफजल गुरूला कधी फाशी दिली जाईल हे अजूनही कोणाला कळत नाही. या दोन्ही बाबी कॉंग्रेसच्या मतपेटीच्या राजकारणाच्या प्रतीकच मानाव्या लागतील. याच मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट हे शिक्षणात आणि नोकऱ्यांत धर्मावर आधारित आरक्षणे देऊ बघत आहे. मुसलमानांमध्ये शिक्षणाचा विस्तार होऊन त्या मस्लिम बांधवांचाही सामाजिक, आर्थिक विकास झाला पाहिजे याच्या प्रत्येक प्रयतनाला आमचा पाठिंबा आहे. आतापावेतो कॉंग्रेस पक्षाने आपल्या स्वत:च्या राजकीय हितासाठी म्हणून मुस्लिम समाजाचे शोषणच केले आहे. दलित ख्रिश्चनांनाही आरक्षण देणे ही बाब देखील अशीच आहे.
ईशान्य भारत आणि नक्षलवादी आव्हाने, बांगलादेशातून होणारी घुसखोरी आणि या हिंसाचारासमोर कॉंग्रेसने टेकलेले गुडघे याचा आढावा गडकरी यांनी आपल्या तपशीलवार भाषणात घेतला.
Friday 19 February, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment