Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 February, 2010

कॉंग्रेस राजवटीत दहशतवाद वाढला: नितीन गडकरी यांचा आरोप

कुशाभाऊ ठाकरे नगर (इंदूर), दि. १७ (प्रतिनिधी): कॉंग्रेसच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देण्यासारख्या अनेक घटना घडल्याचा आरोप भाजपने केला असून पुणे बॉंबस्फोटामुळे दहशतवादी सहज असले हल्ले घडवून आणू शकतात हे सिद्ध झाले आहे, असे असताना सरकार केवळ मतांचे राजकारण करीत असल्याचा आरोप आज भाजपचे नूतन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे केला. गडकरी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानशी संबंध, दहशतवाद, नक्षलवाद आणि महागाई या मुद्यांवर आपले मत प्रदर्शित केले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लालकृष्ण अडवानी, माजी अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षात "नवतीचे राज्य' आल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांनाही त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
पक्षातील नाराज नेत्यांना फैलावर घेताना ते म्हणाले, की कुठल्याही नेत्याने एक बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावी, की आदर आणि सन्मान मागून मिळत नाही तर तो दुसऱ्याला दिल्यानेच मिळतो. हे पटवून देताना त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील "छोटे काम से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई बडा नही होता' या ओळीही उदघृत केल्या.
पक्षातील बंडखोर नेत्यांना खडसावताना त्यांनी सांगितले, की सामान्य कार्यकर्त्याला पक्षाकडून कसलीही अपेक्षा नसते त्यामुळे तो कधीही बंडखोरीचा झेंडा उभारत नाही. मात्र ज्याला पक्षाने सर्व काही देऊन मोठे केले तोच पक्षाच्या विरोधात जाणे चुकीचे आहे.
शिवसेनेसोबत युती कायम
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचे काही बाबतीत मतभेद असले तरीही त्याचा कुठलाही परिणाम युतीवर होणार नसून दोन्ही पक्षांची युती कायम राहील, असे भाजपने आज स्पष्ट केले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत पत्रकारांना सांगितले, की भारतभूमी सर्व भारतीयांची आहे अशी भाजपची भूमिका आहे. अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही ही भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना याबाबत त्यांची वेगळी भूमिका मांडत असली तरीही त्याचा युतीवर कुठलाही परिणाम होणार नाही.
रालोआकडे आघाडीचे सरकार चालवण्याचा मोठा अनुभव आहे. २६ पक्षांसोबत आम्ही सरकार यशस्वी रित्या चालवून दाखवले आहे. या सर्व पक्षांशी आमचे तत्वतः अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. मात्र सरकारवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. शिवसेनेसोबत आमचा २५ वर्षांचा घरोबा आहे आणि तो कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने काश्मीरवरील नियंत्रण गमावलेः गडकरी
केंद्रातील कॉंग्रेस सरकार अमेरिकेच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानशी चर्चा करत असून घाई गडबडीत अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. सरकारच्या या चुकीच्या निर्णयांमुळे काश्मीरवरून आपले नियंत्रण सुटत चालले असल्याचा धोक्याचा इशारा नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. बंद दरवाज्याआड झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनी बैठकीबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
-----------------------------------------------------------------
'आता तरुणाईचे राज्य'
भारतीय जनता पक्षाच्या कार्यपध्दतीत आता तरुणांचे राज्य आले असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही ही बाब ध्यानात घ्यावी. दुसऱ्याची रेषा लहान करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल हे पाहणे कधीही चांगले, असे परखड मत श्री. गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

No comments: