वास्को, दि. १९ (प्रतिनिधी): आज भारतीय नौदलात 'मिग-२९ के' ही लढाऊ विमाने सामील झाल्याने भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनले आहे. भारत सरकारकडून सर्व सुरक्षा दलांना पुरवण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांमुळे येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाताना आपला देश मागे पडणार नसल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री श्री ए.के ऍन्टनी यांनी केले.
आज सकाळी दाबोळी येथे असलेल्या आय.एन.एस हंसा या नौदलाच्या तळावर चार मिग - २९के या लढाऊ विमानांच्या राष्ट्रार्पण समारंभाला संरक्षण मंत्री श्री ऍन्टनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत रशियाचे उद्योग व व्यापार मंत्री व्हिक्टर ख्रितेंको व उपमंत्री डेनिस मेनतुरो,गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, रशियाचे दूत अलेक्झांडर काडाकिन, भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा, गोवा विधानसभेचे सभापती प्रतापसिंग राणे, महसूल मंत्री जुझे फिलीप डिसोझा, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री श्री ऍन्टनी यांनी आजचा दिवस भारतीय नौदलासाठी एक सुवर्णदिन असल्याचे सांगून गेल्या कित्येक काळापासून प्रतीक्षेत असलेली नौदलाची मागणी आज पूर्ण झाल्याचे ते यावेळी म्हणाले. रशिया सरकारने या लढाऊ विमानांसाठी आमच्याशी केलेल्या सहकार्याबाबत श्री ऍन्टनी यांनी त्यांचे यावेळी आभार मानून येणाऱ्या काळातही त्यांच्याकडून अशा प्रकारे सहकार्य मिळणार असल्याची आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, या समारंभाच्या वेळी नौदलात असलेल्या सी - हॅरियर, इल्युशन - ३८, चेतक हेलिकॉप्टर, किरण व डोनियर अशा विमानांबरोबर मिळून मिग - २९के या विमानांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हवाई कसरती सादर करून आपल्या क्षमतेचे सादरीकरण केले. आज भारतीय नौदलात सामील करण्यात आलेली ही मिग - २९के विमाने उडवण्यासाठी भारतीय नौदलाच्या दहा वैमानिकांना रशिया देशात खास प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी आत्तापर्यंत पर्यंत मिग - २९के विमाने चारशे तास चालवलेली आहे (प्रत्येकाने चाळीस तास). सदर विमानांना हाताळण्यात येणाऱ्या पथकाला "ब्लॅक पॅंन्थर' या नावाने ओळखण्यात येणार असून त्यांना आज संरक्षण मंत्री तसेच इतर उपस्थित मान्यवरांकडून यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर मिग विमाने नौदलात असलेल्या सी - हॅरियर या विमानांपेक्षा साठ ते सत्तर टक्के जास्त सुरक्षित असून ती उडवण्यासाठीही सोपी असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. आज झालेल्या सदर समारंभाच्या वेळी भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा यांनी आपल्या स्वागतपर भाषणाच्या वेळी भारतीय नौदलाने आज या मिग - २९के लढाऊ विमानांना आपल्या ताफ्यात सामील करून आणखीन एक उंच पाऊल घेतल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संरक्षण मंत्री ऍन्टनी हे वायू सेनेच्या खास विमानाने येथे येऊन कार्यक्रमानंतर ते पुन्हा येथून रवाना झाले.
------------------------------------------------------------------------
'त्या'स्फोटांबद्दल दिलगिरी
पत्रकार परिषदेत बोलताना संरक्षण मंत्री श्री. ऍन्टनी यांनी मिग २९ के या विमानांमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण तसेच उत्तर गोव्याच्या लोकांना त्रास सोसावा लागल्याने आपण गोमंतकीय लोकांची माफी मागत असल्याचे यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रथम दक्षिण तर नंतर उत्तर गोव्यात मोठ्या स्फोटांचे आवाज आल्याने येथील जनता मोठ्या प्रमाणात भयभीत झाली होती. हा कसला धमाका आहे याबाबत नंतर तपासणी करण्यात आली असता मिग - २९के या विमानांचा हा आवाज असल्याचे यावेळी उघडकीस आल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.
Saturday 20 February, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment