भाजपाचा २१ एप्रिलला संसदेला घेराव
१ मार्चपासून हस्ताक्षर अभियान राबविणार
कुशाभाऊ ठाकरे परिसर (इंदूर), दि.१९ : आकाशाला भिडलेली आणि सर्वसामान्य माणसाचे जिणे हराम करणारी महागाई थांबवा अन्यथा सत्ता सोडा, असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला असून, २१ एप्रिल रोजी दिल्लीत संसदेला घेराव करणार असल्याची घोषणाही केली.
महागाईवर केंद्रित आर्थिक प्रस्तावाला अनुमोदन देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आज भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.
ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मांडलेल्या आर्थिक प्रस्तावाला पाठिंबा देतानाच सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारवर जोरदार प्रहार केला.
कॉंग्रेसने वाढविलेल्या महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला असून, सामान्य माणसाच्या पोटाची लढाई लढण्याचा संकल्प करून येथून जा, असे आवाहन सुषमा स्वराज यांनी केले.
महागाईविरोधी लढ्याला गती देण्यासाठी आणि दिल्लीचे तख्त हलविण्यासाठी १ मार्चपासून देशभर "हस्ताक्षर अभियान' राबविण्याचीही भाजपाची योजना असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता हवा असल्याने, सर्व कार्यकर्त्यांनी या हस्ताक्षर अभियानात सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात, असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी केले.
आपले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे "अर्थतज्ज्ञ' असल्याचे सांगितले जाते. पण, त्यांचे अर्थतज्ज्ञ असणे हेच महागाई वाढण्याचे प्रमुख कारण आहे. विकास दर वाढला असल्याचे ते जगभर सांगत असतात. पण, महागाईच्या ओझ्याखाली गरीब, सर्वसामान्य माणूस मरतो आहे, याकडे ते दुर्लक्ष करतात, ही बाब गंभीर असल्याचे सांगत सुषमा स्वराज यांनी खास आपल्या शैलीत केंद्र सरकारवर आसूड ओढले.
गुजरात आणि मध्यप्रदेश या भाजपाशासित राज्यांमध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांना दोन-तीन रुपये किलो दराने धान्य दिले जात असल्याकडे लक्ष वेधतानाच, "गुजरात हे विकासाचे मॉडेल आहे,' तर मध्यप्रदेश हे "संवेदनशील'तेचे मॉडेल आहे, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
देशात महागाई कशी वाढली, त्याबाबतच्या आकडेवारीची पोल आपण २२ पासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खोलू आणि भ्रष्टाचारासोबतच महागाईचा मार खात असलेल्या जनतेचा आवाज बुलंद करू, असेही स्वराज यांनी सांगितले.
साखर कडू झाली, डाळ गरिबाच्या ताटातून गायब झाली, आता कांदा खाताना नव्हे, तर कांदा खरेदी करतानाच सामान्य माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. असे असताना "आम आदमी'बाबत बोलण्याचा अधिकार कॉंग्रेसला राहिलेला नाही. "आम आदमी'च्या हिताचा विचार केवळ भाजपाच करू शकते. अटलजी पंतप्रधान असताना रालोआच्या सत्ताकाळात आम्ही हे कृतीने सिद्ध केले आहे, याकडे सुषमा स्वराज यांनी लक्ष वेधले. महागाईचा फटका महिलांनाच कसा बसतो, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
गरिबाच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप कॉंग्रेसने केले आहे. महागाईचे स्वत:च केलेले सर्व विक्रम कॉंग्रेसने तोडले आहेत. "दाम बढाओ, गरिबों का धान्य कोटा घटाओ,' हे कॉंग्रेसचे धोरण झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सुषमा स्वराज भाषणाला उभ्या राहताच राजमाता सिंधिया सभागृहात उपस्थित राष्ट्रीय परिषद सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या भाषणातील जोशामुळेही सभागृहात चैतन्य निर्माण झाले होते.
"महंगाई को रोक न सके, वह सरकार निकम्मी है,
जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है...
या सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.
Saturday 20 February, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment