Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 16 November, 2009

६८ जण बेपत्ता असल्याने अन्य खलाशीही धास्तावले!

खलाशांअभावी मच्छीमारी मंदावली

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - समुद्रात "फियान' चक्रीवादळाचे पाहिलेले तांडव, बुडालेल्या बोटी आणि वादळाच्या पाचव्या दिवशीही ६८ खलाशी बेपत्ताच असल्याने अनेक खलाशी सध्या समुद्रात जाण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आज पाचव्या दिवशीही अनेक जण मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्यास ट्रॉलरवर चढले नाहीत. याचा परिणाम मच्छीमारीवर झाला आहे.
आपले सहकारी बेपत्ता असल्याने अन्य खलाशी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे मांडवी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो यांनी सांगितले. मात्र, आज पहाटे १५ ट्रॉलर समुद्रात गेले तर, २५ ट्रॉलर उद्या किंवा परवा मच्छीमारीसाठी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली. चक्रीवादळ झाले त्यावेळी समुद्रात असलेल्या खलाशांनी प्रत्यक्ष या वादळाचा अनुभव घेतला आहे. जे या वादळाच्या तडाख्यातून वाचले आहेत, त्यांनी आपल्याच बोटीवरील आपले साथीदार बुडून दिसेनासे झाल्याचे पाहिले आहे. ती भीती त्यांच्या मनात अजुनीही घर करून आहे. त्यामुळे कोणीही बोटीवर जाण्यास तयार होत नाहीत आणि आम्हीही त्यासाठी हट्ट धरलेला नाही, असे आफोन्सो यांनी सांगितले.
वादळानंतर समुद्रात बेपत्ता झालेल्या खालाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाही. यातील अनेकांची वाचण्याची शक्यता आता कमीच दिसायला लागली आहे. जे देवगड किंवा मालवणच्या बंदरावर सुखरूप पोचले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र या ६८ जणांशी पाच दिवसानंतरही कोणताच संपर्क झालेला नाही, असे श्री. आफोन्सो यांनी सांगितले.
वादळानंतर सर्व वर्तमानपत्रातून आणि वृत्त वाहिनीवर मोठ्या प्रमाणात खलाशी बेपत्ता असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातील त्यांचे कुटुंबीयांनी गोव्यात धाव घेतली आहे. तर, जेटीवरील अनेक खलाशी घरी जाण्याचा मनःस्थितीत आहे. यातील बरेचसे खलाशी आपल्या गावात निघून गेले आहेत. त्यामुळे मच्छीमारीसाठी ट्रॉलर समुद्रात सोडणेही ट्रॉलरच्या मालकांना कठीण झाले आहे. सध्या मालिम जेटीवरील ट्रॉलरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

No comments: