दाबोळी विमानतळ विस्तारीकरणाचा मोठा गाजावाजा करून सरकारने शिलान्यास कार्यक्रम पार पाडला पण आपल्या माहितीनुसार ही निविदाच रद्दबातल ठरल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला.राज्यातील पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय स्थिती बनली आहे. मोपा विमानतळ प्रकल्प रखडत असताना दाबोळीच्या विस्ताराबाबत केंद्रातील व राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकार केवळ बोळवण करीत असल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला.
केंद्रीय विमानवाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते राज्य सरकारने दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणाचा शिल्यान्यास केला होता. मुळात निविदेला मान्यता मिळण्यापूर्वीच हा कार्यक्रम करण्यात आला होता व आता ही निविदा कालबाह्य ठरल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात एकमेव विमानतळ असलेल्या दाबोळीवर ताण वाढल्याने हे विस्तारीकरण तात्काळ हाती घेण्याची गरज होती. मुळात या विस्तारीकरणाला भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रीय विमानवाहतूक राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मान्यता दिली होती.आपण मुख्यमंत्री असताना या विस्तारीकरणाची जागा उपलब्ध करून दिल्याचा दावाही पर्रीकर यांनी केला. जुवारी नदीवरील कमकुवत पुलाच्या ठिकाणी नवीन पुल बांधण्याची कुवत नसलेल्या सरकारकडून सागरी सेतूच्या घोषणा केल्या जाणे हे हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.सागरी सेतूच्या एकूण संकल्पनेबाबतच संशय निर्माण करण्यासारखी परिस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली. दाबोळी,मोपा व जुवारी पुलाबाबत भाजपचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक हे लोकसभेत आवाज उठवतील व आपणही याबाबत पाठपुरावा करणार असेही ते म्हणाले.
Wednesday 18 November, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment