Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 November, 2009

संसदेत महागाई, मधु कोडा, माओवादी हिंसेचे मुद्दे ऐरणीवर

हिवाळी अधिवेशन आजपासून
नवी दिल्ली, दि. १८ : मधु कोडापासून तर टेलिकॉम घोटाळ्यापर्यंतचे अनेक विषय कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी तयार असताना महागाईसारख्या काही मुद्यांवर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला घेरण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यतांच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुमारे एक महिनाभर चालणारे हे अधिवेशन विरोधी पक्षांसाठी अनेक मुद्यांवर सरकारला चिमटे काढण्यासाठी पोषक ठरले आहे. माओवादी हिंसाचाराच्या मुद्यावर डावे पक्ष आणि तृणमूल अडचणीत असताना ऊस उत्पादकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या अधिवेशनात लिबरहान आयोगाचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्यावरून संपुआ आणि भाजपादरम्यान शाब्दिक चकमकीही उडणार असे दिसत आहे.
लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यांनीच आपल्या मृदू आवाजात हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहे. भारतीय जनता पार्टीने ऊस उत्पादन नियंत्रण सुधारणा आदेशावर पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव आणण्याचे ठरविले आहे. याशिवाय श्रीलंकेतील तामिळांचा प्रश्न, वातावरणातील बदल, चीनच्या संदर्भातील परराष्ट्र धोरण हे मुद्देही विरोधी पक्ष उपस्थित करणार आहे.
डावे पक्ष सरकारला महागाईसह सार्वजनिक कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण, कामगार संघटनांच्या अधिकारांवर गदा, कृषी धोरणविषयक मुद्यांवर सरकारला जाब विचारणार असल्याचे भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांनी सांगितले.
मात्र, संसद अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काही दिवसात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अनुपस्थित राहणार आहेत. कारण २१ नोव्हेंबरपासून ते आठवडाभरासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पुन्हा ६ डिसेंबरपासून दोन दिवस तर रशियाला जाणार आहेत.

No comments: