Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 November, 2009

विक्रमी पावसामुळेच काणकोणात पूरस्थिती

समुद्रविज्ञान संस्थेचा अहवाल सादर
पणजी, दि.२०(प्रतिनिधी): काणकोण तालुक्यावर २ ऑक्टोबर रोजी ओढवलेली पुराची घटना ही अनाकलनीय अशीच होती. केवळ सात तासांत काणकोणात विक्रमी पावसाची नोंद झाल्याने पाणी साठवण्याची क्षमता संपली व तळपण नदीचे पात्रही क्षमतेपेक्षा विस्तारल्याने तालुक्यात पूर आला, अशी माहिती राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे अध्यक्ष तथा काणकोण पुरासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचे प्रमुख डॉ.सतीश शेट्ये यांनी दिली.
आज आल्तिनो येथील मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी श्री. शेट्ये यांनी आपला अहवाल मुख्यमंत्री कामत यांना सोपवला. यावेळी समितीचे इतर सदस्य जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते श्री. नाडकर्णी, अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन, हवामान खात्याचे प्रमुख के. व्ही. सिंग तथा सदस्य सचिव मायकल डिसोझा उपस्थित होते. या अहवालात या घटनेची शास्त्रोक्त पद्धतीने चिकित्सा करून विविध विषय ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारची आपत्ती भविष्यात टाळण्यासाठी काही सूचनाही या समितीने केल्या असून त्याद्वारे राज्य सरकारला आपत्ती व्यवस्थापनासंबंधी धोरण ठरवता येणे शक्य असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तळपण नदीच्या पात्रातील गाळ उसपण्याची गरज असल्याचे स्पष्ट करताना डोंगरावरील माती नदीत वाहून जाऊ नये यासाठी झाडे लावण्याचा एक चांगला उपाय त्यांनी सांगितला.
दरम्यान, काही ठिकाणी खाणींमुळे डोंगरावर झालेल्या अतिक्रमणाचा विषयही गंभीर असल्याचे ते म्हणाले. काणकोणसारखी परिस्थिती भविष्यात कुठेही उद्भवू शकते, त्यामुळे सगळीकडेच आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे या अहवालासाठी आभार मानले व या अहवालाचा अभ्यास करून पुढील उपाययोजनांचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.

No comments: