Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 September, 2009

'बिट्स'च्या ४७ विद्यार्थ्यांना कावीळ

झुआरीनगर येथील तांत्रिक महाविद्यालय ११ पर्यंत बंद
विद्यार्थी परतीच्या वाटेवर

वास्को, दि. २५ (प्रतिनिधी): झुआरीनगर येथील "बिट्स पिलानी'च्या गोवा कॅम्प्समधील विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून व्यवस्थापनाने १६ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातून येथे शिक्षणासाठी आलेल्या सुमारे ४७ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २४०० विद्यार्थ्यांनी आपल्या घरची वाट धरली आहे. देशातील नामवंत तांत्रिक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांअभावी एकप्रकारचा शुकशुकाट पसरला आहे. "बिट्स'च्या कोणत्याही कॅम्प्समध्ये अशा प्रकारे सुट्टी जाहीर करण्याची ही पहिलीच घटना आहे.
यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी येथील अधिकारी डॉ. आर. पी. प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता, महाविद्यालयाच्या कॅम्प्समध्ये असलेल्या "एएच२' व "एएच६' या दोन सदनिकांत राहणाऱ्या ४७ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सोयींनी युक्त अशा "बिट्स पिलानी गोवा'मध्ये या रोगाची साथ पसरण्यामागचे कारण शोधून काढण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून ११ ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवस्थापनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्यातून हा आजार पसरलेला नसल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. या कॅम्प्समध्ये एकूण १४ हॉस्टेल्स आहेत. गेल्या पाच दिवसांत हा आजार पसरलेला असून इतर विद्यार्थ्यांना याची बाधा होऊ नये तसेच आजारी विद्यार्थ्यांवर उपचारासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांना १६ दिवसांची सुट्टी देऊन घरी पाठवण्याचा निर्णय काल घेण्यात आल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले. बहुतेक विद्यार्थी आपआपल्या घरी जाण्यासाठी निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. साफसफाई, जेवण खाण या संदर्भात येथे आवश्यक काळजी घेतली जात असल्याचे सांगताना भूगटार व इतर गोष्टींची तपासणी सुरू असून अद्याप काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार असून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी डिसेंबरच्या सुट्टीत "अतिरिक्त वर्ग' घेण्यात येणार असल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले.
दरम्यान, एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यासाठी येथील रेल्वे व्यवस्थापनाला तसेच इतर वाहतूकदारांना खास व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली आहे.
२४०० विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७० टक्के विद्यार्थी आपल्या घरी जाण्यास निघाले आहेत.
आज सकाळी या विद्यालयाला भेट दिली असता शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी आपले सामान घेऊन भाड्याच्या गाड्या करून घरी जाण्यासाठी निघाल्याचे दिसून आले. दरम्यान, येथील काही "ट्रॅव्हल एजन्सीं'शी संपर्क साधला असता वास्कोहून आंध्र प्रदेश, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे तीनतीन खास बसेस "बिट्स'च्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने रेल्वेमार्गे व विमानाने आपल्या घरी जाण्यास निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अखिल मेहता यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------
झुआरीनगर येथील "बिट्स पिलानी' महाविद्यालयाच्या स्थापनेपासून येथे नवरात्री व दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गा मातेचे पूजन करण्यात येते. परंतु, या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे येथे शुकशुकाट पसरल्याचे प्रा. ए. पी. कोले यांनी सांगितले. २००४ सालापासून "बिट्स'च्या गोवा कॅम्प्समध्ये दुर्गामाता पुजण्यात येते. यात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आता मात्र व्यवस्थापनावरच उर्वरित दिवसांतील कार्यक्रम साजरे करण्याची पाळी आली आहे.

No comments: