नवी दिल्ली, दि. २४ : भारताची चंद्रयान-१ ही मोहीम अर्धवट अवस्थेतच संपुष्टात आली असली तरी, चंद्रावर पाणी असल्याचा मोठा आणि ऐतिहासिक शोध लावण्यात यशस्वी ठरली आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे चंद्रयान मोहिमेने दिल्याचे आज शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
"नासा'च्या शास्त्रज्ञांनी याविषयीची घोषणा आज केली. भारताने चंद्रयानासोबत "नासा' या अमेरिकी संशोधन संस्थेचे "मून मॅपर' उपकरण पाठविले होते. "मून मिनरॉलॉजी मॅपर' नामक या उपकरणाला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडले आहे. २२ ऑक्टोबर २००८ रोजी मून मॅपरने याविषयीचे पुरावे शोधले आहेत. पाण्याचे रासायनिक नाव आहे "एच२ओ' आणि चंद्रावर सापडलेले रसायन आहे "ओएच'. म्हणजेच यात हायड्रोजनचा एक अंश मिसळला तर चंद्रावर पाणी तयार होऊ शकते. संपूर्ण जगासाठीच हा शोध अतिशय ऐतिहासिक स्वरूपाचा असून याची भारताच्या नावे सुवर्णाक्षरांनी नोंद केली जाणार आहे.
चंद्रावर पाणी आहे की नाही याविषयीच्या गेल्या चार दशकांपासूनच्या वादावर आता पडदा पडला आहे. आजपासून ४० वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी चंद्रावर पाणी असावे, असा अंदाज व्यक्त केला होता. पण, त्याविषयीचे ठोस पुरावे सापडले नव्हते. आता मात्र पाण्याचे अंश तिथे सापडल्याने ही बाब पुरती स्पष्ट झाली आहे.
तलाव किंवा झऱ्याच्या स्वरूपात हे पाणी नाही. चंद्रावरील डोंगर आणि धुळीच्या कणांमध्ये बाष्पांच्या स्वरूपात पाण्याचे अस्तित्व आढळले आहे. अर्थातच हे प्रमाण अतिशय कमी आहे. पृथ्वीवरील कोणत्याही वाळवंटापेक्षा चंद्राचा भूभाग कोरडा आहे. पण, चंद्रावरील मातीमध्ये आर्द्र स्वरूपात पाणी मिळू शकते, हे आता पुरते सिद्ध झाले आहे.
यापूर्वी चंद्रावर ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत, अशा खोल खड्ड्यांमध्ये बर्फाचे अस्तित्व सापडले होते. चंद्रयान मोहिमेत चंद्रावरील पाण्याचे पुरावे सापडल्याने ही मोहीम यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. चंद्रयानाशी इस्रोचा संपर्क तुटण्यापूर्वी चंद्रावर पाणी असल्याचे फोटो पाठविण्यात आले होते. त्यामुळे आता चंद्रावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याची शक्यताही बळावली आहे.
Friday 25 September, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment