Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 September, 2009

सुधारगृहे नव्हेत, कैदखाने वाट चुकलेल्या मुलीने मांडली कैफियत!

मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): वाट चुकलेल्या तरुणी वा महिलांना सुधारण्याची संधी देण्यासाठी सुधारगृहात ठेवले जाते; पण तेथील स्थिती इतकी भयंकर बनल्यामुळे हा निवारा सोडून त्या पळ काढतात, असे निरीक्षण "सवेरा' या बिगरसरकारी संघटनेच्या अध्यक्ष तारा केरकर यांनी आज येथे नोंदवले.
सुधारगृहाचा भयावह अनुभव घेऊन आपल्या घरी निघालेली एक परप्रांतीय तरुणी यावेळी त्यांच्यासमवेत होती. त्या उभयतांनी केलेले तपशिलवार वर्णन अशी सुधारगृहे व "अपनाघरा'तून मुले का पळून जातात त्याची कारणे स्पष्ट करणारे ठरले.
बाहेरून फोन आला तर तो घेऊ दिला जात नाही. त्यामुळे एका मुलीला आपल्या वडिलांच्या गंभीर आजाराची माहितीच मिळू शकली नाही. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याला तुरुंगात जशी वागणूक दिली जाते तीच या सुधारगृहातून दिली जाते, अशी कैफियत सदर मुलीने मांडली.
सुधारगृहामागील मूळ हेतू काय तो जाणून घेतला पाहिजे. वाट चुकलेल्यांना शिक्षा देण्यासाठी नव्हे तर वर्तन सुधारण्यासाठी तेथे पाठविले जाते; पण तेथील अधिकारी व कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या कैद्यांप्रमाणे त्यांच्याशी वागतात. त्यामुळेच या सुधारगृहांची बदनामी होत आहे, असे श्रीमती केरकर म्हणाल्या.
वेश्या व्यवसायाकडे कोणीच खुशीने वळत नाही. काही जण परिस्थितीमुळे तर बाकीच्या कोणीतरी फसवून तिथे पोहोचलेल्या असतात. यासंदर्भात त्यांनी गेल्या महिन्यात कुडतरी येथे उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेटचे उदाहरण दिले. त्यात सापडलेल्या मुलींना एजंटांनी नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणले. फसवून या पेशात ढकलले. त्यात त्या मुलींची कोणतीच चूक नव्हती. त्यांना फसविणारे दोन दिवस पोलिस कोठडीत राहून सुटले. समाजात मिसळले. या मुलीना मात्र मान वर करणे कठीण झाले आहे. त्या अजूनही सुधारगृहात आहेत, असेही त्या म्हणाल्या.
सुधारगृहांत आणलेल्यांना संरक्षण देण्याच्या, त्यांची काळजी घेण्याच्या घोषणा सरकार करते. प्रत्यक्षात तेथे काय चालते त्याचा शोध सरकारने घेतलेला नाही. अशा गृहांसाठी सरकार तसेच विविध संघटनांकडून भरपूर निधी येतो. त्याचा विनियोग योग्यप्रकारे होतो काय, याची काळजी कोणीच घेत नाही. या गृहात ठेवलेल्यांवर इतके निर्बंध आहेत की, आजारी पडल्यावर त्यांना बाहेर उपचारही करता येत नाहीत. त्यासाठी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी लागते. बंधने घालून ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मूळ गावी-घरी पाठविणे श्रेयस्कर ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
------------------------------------------------------------------------------
उंदरांचा उच्छाद व फाटक्या चादरी
या सुधारगृहात सर्वत्र अस्वच्छता माजलेली असते. तेथील बिछाने, उशा, चादरी फाटल्या आहेत. दुपारी केलेले व थंड झालेले जेवण सायंकाळीही वाढले जाते. तेथे झुरळे व उंदरांचा उच्छाद आहे. कचऱ्याचे ढीग तसेच ठेवले जातात. ते हटवले जात नाहीत. वापरण्यासाठी आलेले सामान न वापरता तसेच ठेवले जाते. साबण तर नावालादेखील देत नाहीत. "एचआयव्ही' झालेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, त्यांच्याबरोबरच इतरांना ठेवले जाते व जेवणही वाढले जाते, असा गंभीर आरोपही सदर तरुणीने केला.

No comments: