Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 August, 2008

खासदार लाच प्रकरणाची कल्पना पंतप्रधान व सोनियांना होती : अडवाणी

नवी दिल्ली, दि. ३० : खासदार लाच प्रकरणाची तुलना होऊच शकत नाही, कारण हे प्रकरण बोफोर्सपेक्षाही मोठे व चीड आणणारे आहे आणि या प्रकरणाची कल्पना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांना होती, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे नेतृत्व आणि सरकार यांच्या संमतीशिवाय लाचप्रकरण घडूच शकले नसते आणि म्हणूनच पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांनी याप्रकणी मौन सोडावे अशी संपूर्ण देशाला अपेक्षा आहे, असे अडवाणी यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
याप्रकरणी चौकशी करणारी संसदीय समिती सत्य उजेडात आणेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, बोफोर्स प्रकरणी चौकशी करणाऱ्या संयुक्त संंसदीय समितीने ज्याप्रमाणे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न यावेळी झाल्यास देशातील जनता तो खपवून घेणार नाही, असा इशाराही अडवाणी यांनी कॉंग्रेस नेते आणि सरकारला दिला आहे.
खासदार लाच प्रकरण घडल्यानंतर एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या स्तंभाचा हवाला देत अडवाणी म्हणाले की, एक प्रामाणिक व्यक्ती या पंतप्रधानांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, आता त्यांच्या प्रतिमेला कलंक लागला आहे.
१९९९ साली भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे सरकार अवघ्या एका मताने कोसळले होते. त्यावेळी घोडेबाजार करण्याऐवजी आमच्या सरकारने पराभव स्वीकारला होता. त्यामुळे आमचे टीकाकारही आमच्यावर घोडेबाजार केल्याचा आरोप करू शकत नाहीत, असे अडवाणी म्हणाले.
राजकारणात नैतिकतेचे पालन करण्यास आणि देशातील जनतेला स्वच्छ प्रशासन देण्यास भाजपा कटिबद्ध असल्याचे अडवाणी यांनी स्पष्ट केले.

No comments: