Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 August, 2008

लेखानुदानास विधानसभेत मंजुरी

मुख्यमंत्र्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात असलेल्या अंतर्गत अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर आज अखेर लेखानुदानाला मंजुरी मिळवण्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यश मिळवल्याने सरकारच्या अस्थिरतेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर पडदा पडला आहे.
आज विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वित्तमंत्री या नात्याने लेखानुदान मागण्या सभागृहात सादर केल्या. या मागण्यांवर आज माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांनी विचार मांडताना आपल्याच सरकारवर हल्ला चढवला. वित्तमंत्री या नात्याने आपण अर्थसंकल्प सादर केला होता. त्या अर्थसंकल्पात महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने आखलेल्या काही गोष्टी साध्य करण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका त्यांनी ठेवला. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करायचे झाल्यास त्यासाठी अतिरिक्त ३०० कोटी रुपयांची गरज असताना त्याचीही तरतूद सरकारने केली नाही,असे ते म्हणाले. लोकांसाठी आखलेल्या विविध योजनांची पूर्तता करण्यातही सरकारला अपयश आले,असेही ते म्हणाले. दरम्यान,यावेळी नार्वेकर यांनी वित्त खात्याबाबत सांगताना अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच आपले खाते काढून घेण्याचे ठरले होते. केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे आपल्याला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली,असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. विधानसभा कामकाजाचा अवधी कमी केल्याने नार्वेकर यांनीही नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री कामत यांनी या आरोपांचे खंडन करून अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक योजना या पूर्णपणे नव्या होत्या व त्याची कागदोपत्री तयारी करण्यासाठी काही काळ गेल्याने त्या लांबल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातील जनतेसाठी तरतूद केलेला पैसा हा त्यांच्यापर्यंत पोहचवला जाईल व सरकारने निश्चित केलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या लेखानुदानाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.

No comments: