Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 August, 2008

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

कामत सरकारवर पर्रीकरांची खरपूस टीका
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - सरकारच्या नाकर्तेपणामुळे विविध सरकारी खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची घाण सामान्य नागरिकांना सतावत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पंचायत,नदी परिवहन,समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी खात्यांच्या पुरवण्या मागण्यांवर बोलताना त्यांनी प्रशासकीय कारभारातील भ्रष्टाचार व गैरप्रकारांचा पाढाच सादर केला. समाज कल्याण खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत सुमारे २५ हजार लाभार्थी गैरफायदा घेत असल्याचे सांगून त्यांना हुडकून न काढल्यास ही योजना राबवणे अशक्य बनणार असल्याचा धोकाही त्यांनी वर्तवला. पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून खात्याचा अधिकतर पैसा हा केवळ धारगळ मतदारसंघासाठी खर्च करण्यात आला, तर नगरविकास मंत्र्यांनी "सुडा'चा ("स्टेट अर्बन डेव्हलपमेंट एजन्सी'चा) पैसा स्वतःच्या कुंकळ्ळी मतदारसंघात नेला असा टोमणाही पर्रीकर यांनी हाणला. अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हावा,अशी विनंतीही पर्रीकर यांनी केली. अनेक पंचायतीत नियुक्त करण्यात आलेले सचिव पूर्णपणे राजकीय वरदहस्ताने काम करीत असून ते पंचायत मंडळाला योग्य सहकार्य करीत नसल्याची टीका पर्रीकर यांनी केली. राज्यात बाल हक्क कायदा संमत झाला असताना राज्यात अत्याचारीत मुलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला एका विदेशी कुटुंबाला बेकायदा दत्तक दिल्याचा प्रकारही पर्रीकर यांनी उघड केला. विविध नगरपालिकांना उद्योग खात्याकडून व पालिका प्रशासनाकडून मिळणारा हक्काचा पैसा अजूनही मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.पणजी पोटो येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची वाट लागली असून त्यामुळे या भागांत दुर्गंधी पसरल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. आज विरोधी तथा सत्ताधारी पक्षातर्फे अनेक आमदारांनी चर्चेत भाग घेतला. ही चर्चा सुमारे रात्री साडेआठ पर्यंत चालली व त्यानंतर मंत्र्यांचा खुलासा सुरू झाला.

No comments: