Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 24 August, 2008

खास दर्जाच्या भाजपच्या मागणीला सरकारही अनुकूल

दिल्लीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेणार - मुख्यमंत्री
मडगाव, दि. 24 (प्रतिनिधी) - गोव्याला खास राज्याचा दर्जा मिळाला तर अनेक प्रश्र्न सुटणार असल्याचे आता सरकारलाही पटलेले आहे व म्हणून लवकरच एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करण्याचा संकेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे दिला व एक प्रकारे भाजप नेत्यांनी केलेल्या मागणीला टेकू दिला.
वारका येथे अ. भा. चार्टर्ड अकांऊटंट संघटनेतर्फे आयोजित परिषदेच्या समारोपानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान गोव्याची मागणी उचलून धरतील अशी आपली खात्री आहे कारण ती मागणी न्याय्य अशीच आहे.
हिमाचल व उत्तरांचल या राज्यांना असा खास दर्जा दिला गेल्यावर तेथील अनेकविध सवलतींमुळे गोव्यातील अनेक उद्योग तेथे वळले आहेत व तसाच दर्जा गोव्याला मिळावा ही आमची मागणी राहील. त्यामुळे तशा सवलती गोव्यालाही देता येतील. कृषी जमीन बाहेरील लोकांना विकण्यापासून रोखता येईल. गोव्याचे अनेक प्रश्र्न या दर्जामुळे सुटतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले ,राज्याला आज नितांत गरज आहे ती पैशाची व खास दर्जामुळे ती सुटेल, ते म्हणाले.
अ. भा. चार्टर्ड संघटनेने गोव्यात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी जी जमिनीची मागणी केली आहे त्याबाबत विचारता मुख्यमंत्री उत्तरले ,की मागणीचा पुरता अभ्यास करूनच त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.
तत्पूर्वी या चार दिवसीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी विविध संस्थांची गरज असल्याचे प्रतिपादले. या संस्थेने सरकारला महसूल वाढविण्यास मदत करावी कारण आर्थिक दृष्ट्या राज्ये बळकट झाली तर आपोआपच राष्ट्र बळकट होणार असा सल्ला दिला. संघटना राजकारणमुक्त असल्याने तिला ते सहज शक्य आहे असेही ते म्हणाले. आपण काल इंजिनियरींग संघटनेच्या अशाच एका कार्यक्रमात बोलताना अभियंत्यांना आमआदमीसाठी 100 चौ. मी. बांधता येतील असा घराचा आराखडा तयार करण्याचा सल्ला दिल्याचे ते म्हणाले.
या मेगा परिषदेच्या समारोप समारंभात प्रथम गौतम वेर्लेकर यांनी स्वागत केले , प्रीती महात्मे यांनी पाहुण्यांना पुष्प गुच्छ दिले , आशिष वेर्लेकर यांनी ओळख करून दिली तर परिमल कुलकर्णी यांनी आभार मानले.

No comments: