Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 August, 2008

सासष्टीतील तीन ग्रामसभा नागरिकांच्या आक्षेपांमुळे तहकूब

मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) - सासष्टीतील ग्रामसभा म्हणजे मेगा प्रकल्पांसंबंधी वादंग असे समीकरण होऊन बसले आहे, त्यामुळे गेले काही महिने अशा ग्रामसभांतील बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणेची लगबग सुरू असते. आज बाणावली, कोलवा व राय अशा तीन ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा होत्या, त्या तिन्ही सभा वेगवेगळ्या कारणांसाठी तहकूब करण्याचा प्रकार घडला तर बाणावलीमधील नागरिकांनी उद्या सकाळी पंचायत क्षेत्रातील लोकांची खास बैठक बोलावली आहे.
बाणावली पंचायत गेले काही महिने तेथील मेगा प्रकल्पांमुळे गाजत आहे. तेथील ग्रामसभा आज ठरलेली होती. पण तेथील पंचायत सचिव अल्लाउद्दीन हा शुक्रवारपासून रजेवर असल्याने पंचायत मंडळाने ग्रामसभाच पुढे ढकलली व तशी नोटिस काढली. ग्रामसभेचे इतिवृत्त लिहावयाचे पुस्तक व अन्य सर्व कागदपत्रे कुलूपबंद असल्याने व सचिव रजेवर असल्याने ग्रामसभा घेऊन काय उपयोग असा विचार करून ती पुढे ढकलल्याचे काल सरपंच कार्मेलीन यांनी सांगितले.
पण आज सकाळी पंचायत सचिव हजर झाला, गावकरीही जमले परंतु संपूर्ण पंचायत मंडळच न आल्याने ग्रामसभा पुढे ढकलणे भाग पडले . आता ही ग्रामसभा २८ सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरले तर जमलेल्या लोकांनी उद्या सकाळी ९-३० वा . एक व्यापक बैठक घेऊन पंचायतीच्या कारभारावर चर्चा करण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, पंचायत सचिव अल्लाद्दीन याने सांगितले की आपण शुक्रवार व शनिवार असे दोनच दिवस रजेवर होतो. त्यांनी आपल्या कामाचा ताबाही कुणाकडे दिला नव्हता. आणखी एका वृत्तानुसार एका राजकारण्यानेच पंचायत सचिवाला आज बळजबरीने पाठविले. पंचायत मंडळाची कोंडी करणे हाच यामागील त्याचा उद्देश हेाता.
महिला पंचाविरुद्ध तक्रार
राय पंचायतीच्या ग्रामसभेत तेथील सरपंचांच्या पत्नी असलेल्या महिला पंचसदस्याने व्यासपीठावरून खाली उडी टाकून एकाच्या बखोटीला पकडल्यामुळे सभेत गदारोळ माजला व त्याची परिणती ग्रामसभा तहकूब करण्यात झाली. ग्रामविकास मुद्यावर समिती नियुक्त करण्याबाबत एक गावकरी सरपंच नाझारेथ गोम्स याच्याशी हुज्जत घालू लागल्याने पंच असलेल्या एज्मिराल्द संतप्त झाल्या व त्यांनी खाली उडी टाकून रेमो ब्लाजा याला ढकलले व बकोटीला पकडले, अशी तक्रार त्याने केली आहे. सरपंचांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करूनही गदारोळ शांत होत नाही असे पाहून मग सभाच तहकूब केली गेली. ती आता १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दुसरीकडे सरपंचांनी एजमिराल्दा यांनी सदर व्यक्तीच्या बखोटीला धरल्याचे मान्य केले पण मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे गावकऱ्यांनी एज्मिराल्डा यांनी पंचसदस्यत्वाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वर्तनाबद्दल पंचायत संचालकांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोलवातही सभा तहकूब
कोलवा पंचायतीची ग्रामसभा तहकूब केली गेली ती वेगळ्याच कारणासाठी. सरपंच व पंचायतमंडळ पूर्ण तयारीनिशी आलेले नाही त्यामुळे त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे वा खुलासे मिळत नाहीत, असा आरोप करून पूर्ण तयारीनिशी येण्यासाठी सभेची तारीख २८ ऑगस्ट मुक्रर करण्यात आली. सरपंच सुझी फर्नांडिस यांनी ती मान्य केल्यामुळे अनुचित प्रकाराविना ग्रामसभा पार पडली.

No comments: