Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 August, 2008

बिहारला एक हजार कोटींची मदत जाहीर सव्वा लाख टन धान्यही देणार

पाटणा, दि. २८ : बिहारमध्ये कोसी नदीने दिशा बदलविल्याने निर्माण झालेली पूरस्थिती अधिकच गंभीर झाली असताना आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह या प्रदेशाचा दौरा करून संपूर्ण स्थितीची पाहणी केली. येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी बिहारमधील पूर ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले आणि राज्याला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन एक हजार कोटींचे पॅकेज दिले आहे.
मधेपुरा, सुपौल,अररिया आणि पूर्णिया जिल्ह्यातील अनेक नव्या परिसरात आज पुराचे पाणी शिरले. आज पुरामुळे सुमारे १० जण दगावल्याचे वृत्त आहे. मदत कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. मधेपुरा जिल्ह्यातील १० तालुक्यातील १२६ पंचायत क्षेत्रातील सुमारे २५६ गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. पुरामुळे येथील सुमारे १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. या परिसरात पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी ८६ नावा आणि ११ मोटरबोट्स कार्यरत आहेत. पुराचे पाणी कुमारखंड, ग्वालपाडा, मुरलीगंज, मधेपुरा, सिंहेश्वर, बिहारीगंज, उदाकिशुनगंज, शंकरपूर, आलमनगर, पुरैनी आदी ठिकाणी शिरले आहे.

पंतप्रधानांचा दौरा
बिहारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आणि बिहारसाठी १ हजार कोटींचे मदतीचे पॅकेज दिले. याशिवाय, वेळोवेळी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले. या दौऱ्यादरम्यान सोनिया गांधीही त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी कोसीमुळे प्रभावित झालेल्या सुपौल, सहरसा, अररिया आणि मधेपुरा जिल्ह्यांचे सर्वेक्षण केले.

सव्वा लाख टन धान्यही देणार
बिहारमधील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी कोट्यवधींच्या पॅकेजसह सुमारे सव्वा लाख टन धान्यही देण्याचे जाहीर केले आहे. कोसीचा प्रकोप पाहून पंतप्रधान हेलावले. आतापर्यंत या पुरामुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. पण, शासकीय स्तरावर हा आकडा अधिकृतरित्या सांगण्यात आलेला नाही. पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यात गृहमंत्री शिवराज पाटील, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान हेही सहभागी होते.

मदत शिबिरांमध्ये झुंबड
बिहारचे चार मोठे जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. येथील सुमारे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यांना मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. या शिबिरांमध्येही आता लोकांची झुंबड उडाली असून तेथे पुरेशी मदत सामुग्री पोहोचविताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. पुरामुळे सर्वत्र पाणीच-पाणी असताना पिण्याचे पाणी मिळणे मात्र दुरापास्त झाले आहे. असंख्य पशुही मदतीअभावी दगावले आहेत. प्रशासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ४४ चिकित्सा शिबिरे तसेच २२ पशू शिबिरे उघडली आहेत. या सर्व ठिकाणी योग्य ती मदत वेळेत पोहोचविण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे.

No comments: