Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 September, 2010

माडकरबंधूंचे मंत्र्याला प्रतिआव्हान

होंड्यात वातावरण तापण्याची चिन्हे
साखळी, दि. २ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्याचे आपणच अनभिषिक्त सम्राट आहोत अशा भ्रमात वावरणारे काही राजकीय नेते या भागातील सामान्य कार्यकर्त्यांची लोकप्रियता अजिबात खपवून घेऊ शकत नाहीत. पर्ये मतदारसंघात तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी बनण्याच्या दृष्टीने आपली घोडदौड पाहून काही नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. माडकरबंधूंची होंडातून हकालपट्टी करण्याची भाषा करणाऱ्यांचे आव्हान स्वीकारत आहे, असे सणसणीत प्रतिआव्हान होंडाचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुरेश माडकर यांनी दिले. यामुळे होंड्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
होंडाचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुरेश माडकर, साखळीचे नगरसेवक यशवंत माडकर, शिवदास माडकर, मयेचे माजी सरपंच सुभाष किनळेकर व न्हावेलीचे सागर नाईक यांच्याविरोधात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली हरवळेतील काही लोकांनी खंडणी वसूल करीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे करण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद या भागात उमटले आहे. अशा प्रकारचे निराधार व खोटे आरोप करून या भागातील गावांतील शांतता बिघडवण्याचे हे कटकारस्थान असल्याची टीका यावेळी सुरेश माडकर यांनी केली. सत्तेचा माज चढलेले नेतेच दुसऱ्यांना संपवण्याची भाषा करू शकतात, असा टोलाही त्यांनी हाणला. साखळी हरवळेतील काही लोकांना काल ३१ ऑगस्ट रोजी दोन बसगाड्यांत बसवून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी नेण्याचा प्रकार घडला. तिथे नथ्रुमल खाणीवरील खनिज वाहतूकदारांकडून, वरील पाच व्यक्तींकडून खंडणी वसूल केली जाते असा आरोप करण्यात आला. सत्तरीतील एका भ्रष्टाचारी राजकारण्याचाच यामागे हात असल्याची टीका या लोकांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदर मंत्र्याने हरवळेतील दर्शन मळीक याला पुढे करून आम्हांवर केलेले आरोप निराधार आहेत. माडकरबंधूंची होंडातून हकालपट्टी करू, असे आव्हान या नेत्याने दिले आहे व हे आव्हान स्वीकारत असल्याचेही सुरेश माडकर म्हणाले. साखळीचे नगरसेवक यशवंत माडकर यांनीही या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. हरवळेतील लोकांना भडकावून या भागातील एक सत्ताधारी नेता आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. पाळीचे आमदार प्रताप गावस यांना ही गोष्ट माहिती आहे, असे ते म्हणाले. सागर नाईक म्हणाले की, सत्तरीत आपल्याला कुणीही आव्हान देणारा असू नये, या गुर्मीत वावरणाऱ्या एका मंत्र्याने आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच हा खटाटोप चालवला आहे. दशरथ मळीक यांनी १८ रोजी आपल्याविरोधात मारहाणप्रकरणी खोटी तक्रार करून गावकऱ्यांना एकत्र केले. यावेळी सुभाष देसाई व यशवंत माडकर यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. आता जाणीवपूर्वक हे प्रकरण उरकून काढण्यामागे याच नेत्याचा हात असल्याचा आरोप सागर नाईक यांनी केला.
हरवळेवासीयांशी आपली चांगली ओळख आहे व त्यामुळे आपल्याला खंडणी प्रकरणात गोवून बदनामी करण्याचा कितीही खटाटोप केला तरी त्याला हरवळेवासीय अजिबात भीक घालणार नाहीत, असा विश्वास शिवदास माडकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी खंडणीप्रकरणी आपल्याला काहीच माहिती नाही, अशी भूमिका घेत आरोग्यमंत्र्यांवरच अप्रत्यक्ष हे प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न केला. हरवळेवासीयांच्या पंचायत व पालिका या वादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आपण मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली, असेही ते म्हणाले. शिवदास माडकर, यशवंत माडकर व सुरेश माडकर यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध आहेत व त्यांच्याबाबत आपल्याकडे कोणतीच तक्रार नाही, असे सांगून त्यांनी माडकरबधूंना "क्लीन चीट'च दिली आहे. नथ्रुमल खाण कंपनीचे मालक हरीष मेलवानी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याला या प्रकरणाशी काहीही देणेघेणे नाही व आपल्याला काहीही बोलायचे नाही, असा पवित्रा घेतला. तर, दशरथ ऊर्फ दर्शन मळीक यांनी मात्र नथ्रुमल खाण कंपनीकडूनच पणजीला जाण्यासाठी बसगाड्यांची सोय केल्याचे स्पष्ट केले. माडकरबंधूंची दादागिरी बंद करून त्यांना होंडातून हाकलून लावण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले असून या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांना गृहमंत्री रवी नाईक यांचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

No comments: