Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 August, 2010

विद्यमान अध्यक्षांचे पॅनेल पुन्हा विजयी

मराठी अकादमी कार्यकारिणी निवडणूक

पणजी, दि.२९ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यकारिणी निवडणुकीत अकादमीचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांचे पॅनेल निवडून आले. ही निवडणूक शिक्षण, साहित्यिक व कला क्षेत्रातील रिक्त जागांसाठी घेण्यात आली. एकूण ६० सदस्यांपैकी ५३ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ४ मते बाद झाली तर एकूण ४९ मते ग्राह्य धरण्यात आली.
मतदानाच्या सुरुवातीस सदस्यांच्या नावांत घोळ असल्याने सुरेश नाईक, परेश प्रभू यांनी निवडणुकीवर आक्षेप घेतला आणि तसे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
अकादमीच्या कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त ठरलेल्या या निवडणुकीकडे मराठीप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक रंगणार असे दिसताना अध्यक्षांच्या पॅनेलने ४३ मते मिळवून निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले.
इतिवृत्त वाचून मागील हिशेब तपासणी मंजुरी देण्यात आली. तसेच चिटणीसांच्या अहवालास मान्यता दिल्यावर निवडणुकीला आरंभ झाला. मतपत्रिकेतील नावांच्या क्रमवारीला काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक स्थळावर गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक अधिकारी द. वा. तळवणेकर यांनी हस्तक्षेप करून सदर यादीतील नावे अकादमीच्या घटनेनुसार असल्याचे स्पष्ट केले. मग निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्यात आली. आज सकाळी १० ते ३.३० या कालावधीत, विविध क्षेत्रांतील रिक्त जागांसाठी घेतलेल्या निवडणुकीत विजेते ठरलेले, गट क्र.१- गोव्यातील विद्यालयीन प्रतिनिधी ः शामसुंदर कवठणकर आणि सुरेश कोरगावकर. गट क्र.७ मराठी साहित्य आणि कला ः नरेंद्र आजगावकर, शेखर नागडे. कार्यकारिणी सदस्य ः आनंद मयेकर, भारत बागकर. गट क्र.३- गोव्यातील मराठी साहित्यिक ः उदय ताम्हणकर, सुरेश भंडारी, अशोक घाडी, ध्रुव कुडाळकर, मुरारी जिवाजी, दामोदर दाभोळकर, उल्हास प्रभुदेसाई. निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून द. वा. तळवणेकर यांनी, तर सदस्य रंगनाथ वेळुस्कर आणि नारायण धारगळकर यांनी काम पाहिले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ सदस्यांच्या प्रतिक्रिया -
शंभू भाऊ बांदेकर ः गोमंतक मराठी अकादमीच्या कारभाराचा ऱ्हास झाला असून अकादमीची वाटचाल भलत्याच दिशेने सुरू आहे. साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नसलेली मंडळी निवडून येत आहेत. राजकारण्यांप्रमाणे केवळ बहुमताने निवडून येणे हाच येथील स्थायिभाव बनला आहे.
अवधूत कुडतरकर ः सध्याची अकादमी म्हणजे खोगीरभरती करण्याचे व्यासपीठ बनले आहे. कारण ज्याच्या नावे एकही पुस्तक नाही तो निवडणूक जिंकतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. अर्थात, आपण गोमंतकातील मराठी साहित्यातील चळवळ चालूच ठेवणार आहोत.

No comments: