Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 4 September, 2010

अप्पासाहेब देशपांडे यांचे पुण्यात निधन

कोल्हापूर, दि. ३ : नूतनगंधर्व या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि भजनशिरोमणी विनायकराव ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे यांचे आज निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारीच होते. आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आजच पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुलगा कृष्णा, तीन मुली, सून, नातवंडं असा आप्तपरिवार आहे. नूतनगंधर्वांचा जन्म बेळगावमधील संकेश्वर येथे २८ जानेवारी १९२५ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. ग्रामोफोन ऐकून ते मोठमोठ्या गायकांची गाणी हुबेहूब म्हणत असत. अतिशय प्रतिकूल स्थितीतही त्यांनी जयपूर, आग्रा, किराना या घराण्यांची गायकी आत्मसात केली. संकेश्वर येथे त्यांनी कै. शंकरराव पेंटर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरविले. गानसम्राट अल्लादियॉं खॉंसाहेब यांचे सुपुत्र भुर्जीखॉंसाहेब यांच्याकडे गंडाबंधन करून त्यांनी शागिर्दी पत्करली. बालगंधर्वांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी नाट्यसंगीताचा अभ्यास केला. भजन गाण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे ते भजनशिरोमणी म्हणून ओळखले जायचे.
खुद्द महात्मा गांधींनी त्यांचे गाणे ऐकून त्यांना स्वत: कातलेल्या सुताचा हार आणि हरिजन साप्ताहिकाचा अंक देऊन गौरविले होते. संकेश्वराच्या शंकराचार्यांनी त्यांना "नूतनगंधर्व' ही उपाधी दिली होती.

No comments: